प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात महिला व युवतींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्पाला प्रत्येक जिह्यात कार्यान्वित करून अडीच महिने झाले आहेत. अजून 15 दिवसांनी तीन महिने पूर्ण होणार आहेत. या तीन महिन्यांच्या आत या पथदर्शी प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसतील अशी धारणा सर्व पोलीस दलांची होती. अडीच महिन्यानंतर बैठकीत आढावा घेतला असून त्यांचे चांगले परिणाम दिसायला लागले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा येथील महिला पथदर्शी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकारी रोहिणी ढवळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व जिह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, भरोसा सेलच्या अनिता मेणकर व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, महिलांच्या अत्याचारातील मदतीचे प्रस्ताव जिल्हा न्यायालयाच्या कमिटीकडे पाठविले जायचे, काही वेळा ते प्रलंबित राहायचे. मात्र पथदर्शी प्रकल्पामुळे केवळ तीनच प्रस्ताव प्रलंबति आहेत. 490 सीआरपी महिलांच्या माध्यमातून जिह्यातील 23 हजार महिलांपर्यत योजनांची माहिती दिली आहे. यांची माहिती पोलीसांनी आढावा बैठकीत दिलेली आहे. अत्याचार, छेडछाड झाला तर पूर्वी महिला, युवती याबाबत तक्रार द्यायला पुढे येत नव्हत्या. पण या पथदर्शी प्रकल्पामुळे महिला, युवती तक्रार देण्यास पुढाकार घेत आहेत. या प्रकल्पामुळे आपल्याला न्याय मिळेल हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी झालो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू केलेल्या या महिला पथदर्शी प्रकल्पाला चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे.
छेडछाड करणाऱयावर तात्काळ कारवाई
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस हे जरी बंद असले तरी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे बाजारपेठा, मॉलच्या जागा खुल्या आहेत. राजवाडा चौपाटी, उद्याने, फिरायला जाण्याची ठिकाणे आहेत. येथे बीट मार्शलचे पेट्रोलिंग वाढविणार आहे. साध्या वेशात पोलीस कर्मचारी, अधिकारी, महिला कर्मचारी या ठिकाणी गस्त वाढविणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांनाही साध्या वेगात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. मुलींची छेडछाड करताना आढळल्यास तात्काळ कारवाईची मोहीम सुरू करत असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.