कोल्हापूर ः विमा योजनेच्या हप्त्याचा धनादेश भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीकडे देताना बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यावेळी आमदार राजेश पाटील, निवेदिता माने , प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, सर्जेराव पाटील- पेरीडकर, पी.जी.शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, उदयानी साळुखे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए.बी.माने व जी.एम.शिंदे
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा बँकेने 85 वर्षे पर्यंतच्या जिह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या सर्व सभासद शेतकऱयांना दोन लाख रुपयांचा व्यक्तिगत अपघाती विमा उतरला आहे. या विमा हप्त्यापोटी 91 लाख बँकेच्या नफ्यातून भरणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बँकेशी संलग्न सेवा संस्थांचे कर्जदार आणि बिगर कर्जदार असे दोन्ही प्रकारचे शेतकरी या योजनेत समाविष्ट असून अडीच लाख शेतकऱयांना संरक्षण मिळणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू,, वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत अपघाती मृत सभासदाच्या वारसाला दोन लाख रुपये भरपाई मिळणार आहे. कोल्हापूर जिह्यातील 2 लाख 52 हजार 210 कर्जदार व बिगर कर्जदार सभासद शेतकऱयांना या विमा सुरक्षेचे कवच लाभले आहे. कायमचे आणि अंशतः अपंगत्व आल्यासही शेतकऱयाला या योजनेमधून भरपाई मिळणार आहे.
यावेळी संचालक आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, सर्जेराव पाटील- पेरीडकर, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, उदयानी साळोखे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.
अशी आहे वैयक्तिक अपघात विमा योजना
-भारती एक्सा जनरल इन्शुरन्सच्या सहयोगातून अपघाती विमा योजना…..
-सेवा संस्थाकडील कर्जदार व बिगर कर्जदार अश्या एकूण दोन लाख 52 हजार 210 शेतकऱयांना विमा सुरक्षाकवच
-अपघाती मृत्यू झालेल्या शेतकयांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई
-कायम अपंगत्व व अंशतः अपंगत्व आलेल्या शेतकऱयांनाही मिळणार त्या-त्या प्रमाणात भरपाई
अतिवृष्टी व महापूर बाधित शेतकऱयांना व महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुक्रमे सात व सहा महिन्यांच्या व्याजाची 16 कोटी रुपये व्याजाची रक्कम बँक भरणार आहे. ऊस उत्पादकाशिवाय इतर भात, सोयाबीन, भुईमूग, कापूस इत्यादी पिकांसाठी कर्ज घेतात त्यांनाही एक लाखापर्यंतच्या कर्जास व्याज माफ आहे. एक लाखापासून तीन लाखापर्यंत कर्जाला फक्त दोन टक्के व्याज आकारणी केली जाते. शेतकऱयांचे हे व्याजही कोरोनामुळे बँकच भरणार आहे.