पुढील आठवड्यात होणार सुनावणी
कोल्हापूर/ प्रतिनिधी
आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्यातील गायरान व शासकीय जमिनीतील अतिक्रमण धारकांच्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यात याबाबत सुनावणी होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या ६ ऑक्टोंबर २०२२ च्या अतिक्रमण हटविण्याच्या आदेशास तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
गायरान व सरकारी जमिनीवर केलेले काढून त्याचा अहवाल न्यायालयाकडे सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 22 पर्यंत ची घातलेली अट रद्द करावी. गायरान व सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमण धारकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी . ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे, त्यांचे अतिक्रमण शासनातर्फे सर्व्हे करून नियमित करावे. अतिक्रमण नियमित करत असताना ज्या अतिक्रमण धारकांच्या नावे त्यांना राहण्यासाठी जमीन नाही अशा गरजू गरीब अतिक्रमण धारकांचा प्रशासनाने वेगळा सर्व्हे करावा आणि तो सर्वोच्च न्यायालयात सादर करून त्यावर न्यायालयाने योग्य निर्णय घ्यावा. गेली 30 वर्ष गावठाण हद्द वाढ झाली नसल्याने राज्यात सर्वत्र अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे गावठाण हद्दवाढ होण्यासाठी राज्य शासनास निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत नमूद आहे.
याबाबत राज्य शासनाचे म्हणणे न्यायालयाने तात्काळ मागवून घ्यावे. उच्च न्यायालयाने ३१ डिसेंबर २२ पर्यंत अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत दिलेल्या आदेशास तात्काळ स्थगिती द्यावी आदी अनेक मुद्यांवर राज्यातून पाहिली याचिका आमदार आवाडे यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालायत दाखल केली आहे. यावर पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.