प्रतिनिधी/ सातारा
येथील राजवाडा परिसरात असलेले उद्यान ऐककाळी मोकळे आणि विस्तृत असे होते. आता मात्र चारी बाजूने दुकानांची रेलचेल दिसून येते. या वाढलेल्या दुकानांच्या रेलचेलमध्ये हे उद्यान हरवून गेले आहे. पालिकेकडे नाममात्र त्याचे भाडे जाते. सामाजिक कार्यकर्ते नगरविकास विभागाकडे याबाबत तक्रार करणार आहेत.
राजवाडा परिसरात श्री. छ. प्रतापसिंह महाराज उद्यान हे लहान मुलांकरता खेळण्याचे ठिकाण. या उद्यानाच्या प्रवेशद्वाराबरोबरच आजूबाजूला अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे उद्यानाची केंडी झाली आहे. काही दुकानांच्या पिछाडीच्या संरक्षक भिंती सुद्धा बागेच्या हद्दीत आहेत. राजवाडा परिसरात लावण्यात आलेले फलक, लोखंडी गर्डरनी बागेची काही जागा व्यापली आहे. हे उद्यान लहान मुलांना खेळण्यासाठी आहे की अतिक्रमणे करण्यासाठी असा प्रश्न पडत आहे. उद्यानाच्या परिसरात अतिक्रमण करुन उभारलेल्या टपऱयांना पालिकेकडूनच अभय मिळाले आहे. बहुतांश टपऱयांना बरीच वर्षे प्रत्येकी 120 रुपये एवढे नाममात्र भाडे होते. आता तेथे पोटभाडेकरुन ठेवून 30 ते 40 हजार रुपये भाडे आकारत आहेत. जागा पालिकेची अन भाडेवसुली मुळ भाडेकरु कत आहेत, असे चित्र आहे. यात पालिकेला विकास साधताना अडचणी येत आहेत. स्थावर जिंदगी विभागाकडून हालचाल होताना दिसत नाही. राजकीय दबावामुळे ही कारवाई होत नसून त्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते नगरविकास विभागाकडे तक्रार करणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण पालिकेच्या चांगलेच अंगलट येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.