उचगाव / वार्ताहर
२०१८ पासून वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारी, सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून उचगाव, वळीवडे हद्दीतून जाणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमण न काढल्याच्या निषेधार्थ दलित महासंघातर्फे शनिवारी (दि २६) पंचगंगा नदी निगडेवाडी घाट येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.
उचगाव-वळीवडे सीमेवर असलेल्या कुट्या मंदिराशेजारी सोमवार (दि २१)पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या ओढ्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे व शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केली होती. पण प्रशासनाने कारवाई न केल्याने दलित महासंघाचे कार्यकर्ते धरणे आंदोलन करत असून कारवाईबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दलित महासंघाचे कार्यकर्ते शनिवारी पंचगंगा नदीत जलसमाधी घेणार आहेत. ओढाच गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधित बांधकामधारकांवर कारवाई न झाल्यास जलसमाधी अटळ आहे, अशा इशाऱ्याचे निवेदन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब कांबळे व शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.