प्रतिनिधी/ सातारा
आरटीओ कार्यालय परिसरातील अतिक्रमणावर सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा पोकळ कारवाई केली आहे. सोमवारी सर्व टपऱया हटवण्यात आल्या. मात्र गेल्या दोन महिन्यापुर्वी याच ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. तरी पुन्हा टपऱया बोकाळल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या तक्रारी नंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना वारंवार जाग येत असल्याने या पोकळ कारवाया सुरू असल्याची चर्चा टपरी मालकांकडून होत आहे.
अनलॉक नंतर सातारा शहरात पुन्हा अतिक्रमणाने डोके वर काढले आहे. एसटी स्टॅड परिसर, सदर बाझार, मोती चौक, मोनार्क चौक, जिल्हा परिषद ते विसावा नाका या ठिकाणी टपऱयांनी विळखा घातला आहे. यांचा अडथळा वाहतूकीला होत असून नागरिकांनाही नाहक त्रास सोसावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारीनंतर सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतल्याचे संबंधित विभाग प्रमुखांनी सांगितले. या मोहीमेचा शुभारंभ पुन्हा आरटीओ कार्यालय परिसरातील अतिक्रमण हटवून करण्यात आला आहे. दोन महिन्यापुर्वी येथील टपऱया हटवण्यात आल्या तरीही पुन्हा टपरी मालकांनी थाट मांडला आहे. ही कारवाई सुरू असताना पुन्हा टपऱया मांडण्यात येतील अशी चर्चा टपरी मालकांच्यात सुरू होती. या पोकळ कारवायाचा कोणताच फरक टपरी मालकांना होत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. तरीही नगरपालिका पोकळ कारवाईचा धडाका सूरूच ठेवत आहे.