जिल्हा रुग्णकल्याण समितीची बैठक
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आवश्यक औषधांसह अन्य बाबींवर रुग्ण कल्याण निधी खर्च करण्याचा निर्णय रुग्ण कल्याण समितीच्या कार्यकारिणीने घेतला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण, डॉ. राम जाधव, पांडुरंग शिंदे आदी कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
अधिक माहिती देताना सुभाष चव्हाण पुढे म्हणाले, शासनाने रुग्ण कल्याण समितीला 6 लाख रुपये रुग्ण कल्याण निधी दिला होता. त्यापैकी 3 लाख 60 हजार रुपये चालकांच्या मानधनासह अन्य बाबींवर खर्च करण्यात आला. उर्वरित 2 लाख 40 हजार रुपयांचा निधी कोणत्या बाबीवर खर्च करायचा याबाबत विचारविनिमय करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाला पाणीपुरवठा करणाया पाण्याच्या टाकीचे झाकण जीर्ण झाले आहे. हवेमधून येणारा कचरा टाकीत पडल्यास रुग्णांना दूषित पाणीपुरवठा होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन टाकीला नवीन झाकण बसवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करणाया जुन्या पाइपलाइन, व्हाल्व दृरुस्ती अथवा नवीन बसवणे याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील अंतर्गत प्रवेशद्वाराचा काही भाग तुटला आहे. शिशुगृह वार्डमधील काही खिडक्यांचे दरवाजे तुटले आहेत. त्यातून पक्षी आत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर प्राधान्याने निधी खर्च करण्याचा निर्णय समितीच्या कार्यकारिणीने घेतला आहे.
अतिदक्षता विभागामध्ये रुग्णांवर उपचार करीत असताना नातेवाईकांना अनेकदा अत्यावश्यक औषधे बाहेरून आणावी लागतात, असे निदर्शनास येऊ लागले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना पदरमोड करावी लागू नये ही बाब लक्षात घेऊन अत्यावश्यक औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी यावेळी दिली. अत्यावश्यक औषधे खरेदी करून ती अतिदक्षता विभागाकडे सोपवली जातील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.