प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकार गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत होणारा अतिरिक्त रेशनचा पुरवठा मार्चपर्यंत सुरूच ठेवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने अतिरिक्त रेशनचा पुरवठा होणार की नाही, अशा संभ्रमात लाभार्थी होते. मात्र शासनाने मार्चपर्यंत मोफत आणि वाढीव रेशन पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रेशनकार्डधारकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाकाळात गोरगरीब जनतेला अन्नधान्याचा पुरवठा व्हावा, याकरिता मागील 20 महिन्यांपासून अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारकडून पाच किलो तर राज्य सरकारकडून पाच किलो असे एकूण दहा किलो तांदूळ माणसी वितरित केले जात आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांना धान्याचा लाभ घेता येत आहे. केंद्र सरकारने यापूर्वी योजनेची मुदत मार्च महिन्यापर्यंत वाढविली आहे. मात्र कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्याने शासन अतिरिक्त आणि मोफत रेशनचा पुरवठा बंद करणार का? अशा संभ्रमात असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही मार्चपर्यंत अतिरिक्त आणि मोफत रेशनचा पुरवठा होणार आहे.
अंत्योदय आणि बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ वितरित केला जात आहे. त्यामुळे अल्पभूधारक, भूमीहीन, कर्मचारी आणि कष्टकऱयांना या अतिरिक्त रेशनचा लाभ मिळत आहे. जिल्हय़ातील 1749 रेशन दुकानांतून धान्याचा पुरवठा केला जात आहे.