अज्ञातांनी लावलेल्या आगीत गवत जळून खाक : लाखो रुपयाचा शेतकऱयांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवाड येथील डोंगर पायथ्याशी शेतवडीत साठवून ठेवलेल्या 9 गवतगंजींना आग लागून तब्बल 10 ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत बुद्धाप्पा बाबू कणबरकर, यल्लाप्पा विष्णू पाटील, मारुती तातोबा पाटील, आनंद यल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा ओमाण्णा पाटील या शेतकऱयांच्या गवतगंजी भस्मसात झाल्या आहेत. या घटनेमुळे 1 लाखाहून अधिक रुपयाचा फटका बसला आहे. या घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱयांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
उचगाव-गोवाड मार्गावरील डोंगराळ भागात शेतकऱयांनी गवताची कापणी करून गंज्या घातल्या होत्या. सोमवारी दुपारी अज्ञातांनी लावलेल्या आगीत नऊ गवतगंजी जळून खाक झाल्या. गावातील नागरिकांनी त्वरित धाव घेतल्यामुळे इतर गवतगंजींचे नुकसान टळले. शेतकऱयांच्या गवतगंजी भस्मस्थानी पडल्याने चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱयांना फटका बसला आहे. दरम्यान चाऱयाचेदेखील नुकसान झाले आहे. चारा प्रश्न गंभीर बनला असतानाच गवतगंजींना आग लागल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाले आहेत. आगीत संपूर्ण 9 गवतगंजी जळून खाक झाल्याने शेतकऱयांसमोर चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी उन्हाळय़ाला सुरुवात झाली की गवतगंजींना आग लागण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. याकरिता कृषी खाते आणि अग्निशमन दलाने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
सीमाहद्दीवरील गवत गंजींचे नुकसान
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर डोंगर पायथ्याशी असलेल्या भागात सुक्या चाऱयाचे (कराडाचे) क्षेत्र अधिक आहे. दरवर्षी शेतकरी सुगी हंगामात या गवताची कापणी करून साठवून ठेवतात. दरम्यान एकाच ठिकाणी मोठ-मोठय़ा गवतगंजी लावल्या जातात. या एकाच ठिकाणी ठेवलेल्या 9 गवतगंजींना आग लागून नुकसान झाले आहे. सुदैवाने शेतकरी दाखल झाल्याने शेजारील गवतगंजींचे नुकसान टळले आहे.