पशुसंगोपनचे दुर्लक्ष : शेतकरी चिंतेत, आर्थिक फटका
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून अतिवाड गावात लाळय़ा खुरकत रोगाचा शिरकाव झाल्याने जनावरांना लागण झाली आहे. दरम्यान, पशुसंगोपन खात्याकडून उपचार मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱयांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. उपचारांसाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. खात्याने तातडीने प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
उचगाव पशुवैद्यकीय केंद्राच्या अखत्यारित उचगावसह तुरमुरी, बाची, कल्लेहोळ, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, कुदेमनी आदी गावांचा समावेश आहे. मात्र, सध्या अतिवाड गावात या संसर्गजन्य रोगाचा फैलाव झपाटय़ाने वाढल्याने गावातील अनेक जनावरांना लागण झाली आहे. पशुसंगोपन खात्याकडून दरवर्षी दोन टप्प्यात लसीकरण मोहीम राबविली जाते. मात्र, यंदा पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहीम झाली नाही. शिवाय ऑक्टोबर महिन्यातील दुसऱया टप्प्यातील लसीकरण मोहीमदेखील लांबणीवर पडल्याने अतिवाड गावातील हजारो जनावरे लाळय़ा खुरकतची शिकार बनली आहेत. लागण झालेल्या जनावरांना वेळेत उपचार मिळत नसल्याने इतर निरोगी जनावरांनादेखील या रोगाचा फैलाव वाढत आहे. दुधाळ जनावरांना या संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याने दुधात मोठी घट झाली आहे.
एकीकडे शेतकऱयांची सुगी हंगामासाठी धडपड सुरू आहे. दुसरीकडे लाळय़ा खुरकत संसर्गजन्य रोगाने गावात धुमाकूळ घातल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पशुसंगोपन खात्याने तातडीने उपचार करण्याबरोबर लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरून आहे.