ग्रामस्थांची मागणी : बससेवा विस्कळीत, प्रवाशांसह विद्यार्थी वर्गांचे हाल
प्रतिनिधी / बेळगाव
अतिवाड गावची बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची फरफट होताना दिसत आहे. गावच्या बसच्या चार-पाच फेऱया होत्या. मात्र सध्या एक किंवा दोन फेऱया होत आहेत. शिवाय वस्तीची बस देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे तातडीने अतिवाड गावची बससेवा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊनपासून गावची वस्तीची बससेवा बंद झाली आहे. तसेच बसफेऱया कमी करण्यात आल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होताना दिसत आहे. दररोज शेकडो कामगार, विद्यार्थी प्रवास करत असतात. मात्र बसफेऱयाअभावी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
बससेवा अनियमित असल्याने प्रवाशांना बसथांब्यावर ताटकळत थांबावे लागत आहे. काही वेळेला बसच येत नाही त्यामुळे गैरसोय होत आहे. बससेवा नियमित नसल्याने ग्रामस्थांना गावापासून अतिवाड फाटय़ापर्यंत 3 किलो मिटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. उचगाव-कोवाड मुख्य रस्त्यापासून 3 किलो मिटर आत गाव आहे. त्यामुळे सहसा खासगी वाहने जात नाहीत. गावातील बहुतांशी नागरिक कामानिमित्त बेळगावला येत असतात. त्यांना परिवहन मंडळाच्या बसचा आधार घ्यावा लागतो. मात्र बस वेळेवर येत नसल्याने बसफेऱया कमी झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
लॉकडाऊन पूर्वी गावाकडे बसच्या सात फेऱया होत होत्या. मात्र आता एक किंवा दोन फेऱया होत असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन परिवहनने बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे. वस्तीची बस बंद केल्याने रात्री उशीराने प्रवास करणाऱया प्रवाशांना उचगाव कोवाड मुख्य रस्त्यावरून गावापर्यंत पायपीट करावी लागत आहे. किंवा बेकिनकेरे गावापर्यंत चालत यावे लागत आहे. यामुळे वयोवृध्द व लहान बालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
विशेष करून अतिवाडसह बेकिनकेरे व बसुर्ते गावातील विद्यार्थ्यांना बेळगावला येण्यासाठी अतिवाड बसचा आधार आहे. मात्र सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बेळगाव-कोवाड मार्गावर खासगी वाहनांबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या कोवाड, आजरा, गडहिंग्लज बस धावतात. मात्र या बसमधून कर्नाटकचे बसपास चालत नाहीत. त्यामुळे विद्यार्थीवर्गाची अडचण होत आहे. त्यामुळे अतिवाड गावची बससेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.