रेंजचा प्रॉब्लेम : गाव कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : रिचार्ज करूनही पैसे वाया
प्रतिनिधी / बेळगाव
अतिवाड गावात कोणत्याच कंपनीचा टॉवर नसल्याने रेंजअभावी गावातील मोबाईलधारक हैराण झाले आहेत. रेंज मिळविण्यासाठी ग्रामस्थांना गावाबाहेर 2 किलोमीटर यावे लागत आहे. रेंजअभावी मोबाईल कुचकामी ठरले असून अतिवाड गावात संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.
रेंजअभावी फोन लागत नाही, लागलाच तर आवाज येत नाही, अन् चुकून आवाज आलाच तर मध्येच कॉल खंडित होतो. असे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी येत आहेत. मोबाईलना रेंज मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ वैतागले असून रेंज मिळविण्यासाठी दररोज धडपड सुरू आहे. कोणत्याच कंपनीची रेंज मिळत नसल्याने मोबाईलवर नॉट रिचेबलचा सिग्नल येत आहे. त्यामुळे कोणी रेंज देता का रेंज? म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. संबंधित कंपन्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने याचा फटका गावकऱयांना बसत आहे.
बेकिनकेरे गावात उभारलेल्या टॉवरवरून काही वेळेला रेंज मिळते. मात्र सुरळीत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. काही वेळेला वीज गेली की टॉवर बंद होतो. त्याबरोबर मोबाईलची रेंजदेखील गायब होते. आणि मोबाईलवरील संवादही मध्येच बंद होतो. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून तातडीने गावात मोबाईल टॉवर उभारावा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा ग्राहक व ग्रामस्थांनी दिला आहे.
मोबाईल कंपन्यांच्या रिचार्जचे दर वाढले असून रिचार्जसाठी मोबाईलधारकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र अतिवाड गावात रेंजअभावी रिचार्ज केलेले पैसेदेखील वाया जात आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र गावातील मोबाईलना रेंज सापडत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गोर-गरीब विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी महागडे स्मार्ट फोन विकत घेतले आहेत. मात्र रेंजअभावी विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.