वीजपुरवठा खंडित : दैनंदिन कामकाजावर परिणाम, ग्रामस्थांचे हाल
प्रतिनिधी / बेळगाव
मागील चार दिवसांपासून अतिवाड गावचा वीजपुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे परिसरातील काही विद्युत खांब कलंडल्याने व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गावातील पाणी पुरवठय़ावरही परिणाम झाला आहे. हेस्कॉमचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या अंधारात चाचपडत कामे करावी लागत आहेत.
वीजपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पीठ गिरणी, किराणा दुकानदार, मोबाईलधारक हैराण झाले आहेत. विजेअभावी गावातील पीठ गिरणी बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. किराणा दुकानदारांनाही रात्रीच्या अंधारातच अत्यावश्यक गोष्टी पुरवाव्यात लागत आहेत. मोबाईलधारकांना इतर गावात जाऊन मोबाईल चार्ज करण्याची वेळ आली आहे.
काही मोबाईलधारकांचे मोबाईल बंद झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. शिवाय पाणीपुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. परिणामी सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी गर्दी वाढली आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालयांतून ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला फटका बसला आहे. काही जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. अशात वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वादळाच्या तडाख्याने ही समस्या उद्भवली असून हेस्कामने तातडीने लक्ष घालून वीजपुवरठा पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.