प्रतिनिधी /बेळगाव
अतिवाड येथील जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या शिवारातील पाण्याचा इंजिन अज्ञातांनी पळविले आहे. त्यामुळे शेतकऱयांना फटका बसला आहे. आनंद यल्लाप्पा पाटील असे इंजिन मालकाचे नाव आहे. शेतीवडीतील ओढय़ावर पाणी खेचण्यासाठी बसविलेल्या इंजिनची चोरी झाल्याने पिकाला पाणी देण्याचा प्रश्न शेतकऱयांसमोर निर्माण झाला आहे.
शनिवारी रात्री ही घटना घडल्याने शेतकरी वर्गात खळबळ माजली आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके तोंडावर आली असतानाच इंजिनची चोरी झाल्याने शेतकऱयांसमोर संकट निर्माण झाले आहे. संबंधितांनी तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. नाल्यावर बसविलेल्या इंजिनची पाईप कापून इंजिन पळविला आहे. त्यामुळे शेतकऱयाला साधारण 25 हजाराचा फटका बसला आहे. चोरटय़ांनी आता मंदिरे, घर फोडीबरोबर शिवारातील साहित्य लक्ष केल्याने शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.