केळघर / प्रतिनिधी :
रेंगडी ता. जावली येथील 4 व वाटंबे येथील एक असे पाच जण केळघर घाटातील ओढ्याला आलेल्या पुरात वाहुन गेले होते.यामध्ये पाचही जणांचा दुर्देवी मृत्यु झाला होता. शासनाच्या वतीने त्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाच मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांतअधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतिष बुद्धे , ज्ञानदेव रांजणे, मा जि .प . सदस्य राजु भोसले, तलाठी मकरध्वज डोईफोटे, ग्रामसेवक रविकांत सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश सपूर्द करण्यात आले.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अतिवृष्टीने जावली तालुक्यातील केळघर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसह परिसरातील पूल वाहुन गेले असून विहिरी गाडल्या गेल्या आहेत. परिसरातील लाईटचे खांब तुटुन वाहुन गेले आहेत. तसेच पुरामुळे जीवितहानीही झाली आहे. शेतीचे पंचनामे ताबडतोब करण्याचे आदेश दिले असून, बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.