प्रतिनिधी / चिपळूण
अतिवृष्टीने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. असे असताना शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह असंख्य मंत्री, नेतेमंडळी राज्यात दौरे करत असताना कोकणाकडे मात्र सर्वच नेत्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. यातच दोन्ही खासदारांचेही दर्शन दुर्मीळ झाले आहे. भातपिकाचे मोठे नुकसान झालेले असताना कोकणला वाली कोण, असा प्रश्न शेतकऱयांतून उपस्थित केला जात आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱयाला दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच अतिवृष्टीतील नुकसानीची पहाणी करण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते, राज्याचे मंत्री शेताच्या बांधावर जाण्यासाठी दौरे करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार हे नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस मराठवाडा, तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेदेखील सोलापूर दौऱयावर गेले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील तीन दिवसांच्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱयावर आहेत. याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱयावर त्या-त्या भागातील मंत्री तसेच राजकीय पक्षांचे नेते दौरे करत शेतकऱयांना दिलासा देत आहेत.
परतीच्या पावसाने कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले आहे. कोकणात तर भातपिकाची उभी पिके आडवी होऊन पाण्यात तरंगत राहिल्याने त्यावर आता कोंब आले आहेत. कापणी केलेली पिके तर पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. एकीकडे अतिवृष्टी भागात नेतेमंडळी, मंत्री शेताच्या बांधावर जाऊन पहाणीदरम्यान दिलासा देत असतानाच कोकणात मात्र हे चित्र दुर्मीळ झालेले दिसत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सुपूत्र उदय सामंत यांनी नुकसानीसंदर्भात आढावा बैठक घेतली, तर जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोनाबाधित असल्याने ते येऊ शकलेले नाहीत. जिल्ह्यात सुनील तटकरे, विनायक राऊत हे दोन खासदार असले तरी दोघांचेही दर्शन शेतकऱयांना झालेले नाही.
दरम्यान, नेते, मंत्र्यांचे दौरे नसतानाच स्थानिक लोकप्रतिनिधीही शेताच्या बांधावर पोहचलेले नाहीत. नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले असले तरी बहुतांशी गावांत नियुक्त कर्मचारी पोहचलेले नाहीत. पंचनामे होणार असल्याने शेतात नुकसान झालेल्या पिकांची तसेच कापणीची कामे शेतकऱयांना करता येत नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.
खासदार राऊत पाहणीसाठी सोलापूरमध्ये
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये भातशेतीचे पावसाने मोठे नुकसान केले असल्याने शेतकऱयांनी कपाळावर हात मारला आहे. निसर्गसह आलेल्या अनेक वादळांनी यापूर्वीच कोकणचे मोठे नुकसान केलेले आहे. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीत नुकसान झालेले असतानाच खासदार राऊत हे मतदार संघात फिरकलेले नसतानाच सोमवारी ते मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर सोलापूर दौऱयात दिसल्याने शेतकऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.