प्रतिनिधी / सातारा :
दुर्गम भागात अनेक घरांवर दरडी कोसळून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक नागरिक संपर्कहीन झाले आहेत. जीवित व वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर तातडीने संपर्क साधण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षामध्ये विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक अशा दर्जाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग व ग्रामपंचायत विभागातील हे अधिकारी, कर्मचारी आहेत. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास संबंधित स्थानिक प्रशासनाबरोबर तातडीने संपर्क करून समन्वय साधून आपत्तीबाबत वस्तुस्थितीदर्शक व खात्रीशीर माहिती उपलब्ध करून घ्यावी, तसेच ही माहिती जिल्हा प्रशासनास त्वरित सादर करावी. स्थानिक प्रशासनाने नियंत्रण कक्षातील संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क केल्यास त्यांना त्वरित प्रतिसाद द्यावा असे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.