20 जिल्हय़ांमध्ये रेड अलर्ट : रस्त्यांवर कंबरेपर्यंत साचले पाणी
वृत्तसंस्था /चेन्नई
तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे हवामान विभागाने 20 जिल्हय़ांमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या जिल्हय़ांमध्ये चेन्नई, तिरुवल्लुर, रानीपेट, वेल्लोर, सलेम, कल्लाकुरिची ,तिरुपट्टूर आणि तिरुवन्नमलई सामील आहे. या जिल्हय़ांमध्ये 20.4 सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अन्य भागांमध्येही अतिवृष्टीचा अनुमान आहे. तामिळनाडूसोबत आंध्रप्रदेश आणि पुड्डुचेरीमध्येही अत्यंत अधिक पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टय़ामुळे बुधवारी रात्री तामिळनाडूत मुसळधार पाऊस पडला आहे. चेन्नईत अत्यंत अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने इलेक्ट्रिसिटी केबलमध्ये बिघाड होत दक्षिण चेन्नईतील वीजपुरवठा ठप्प झाला. कोडमबक्कम आणि अशोकनगर भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे. अनेक भागांमध्ये झाड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एका निवारा केंद्रात पोहोचून तेथे लोकांसाठी करण्यात आलेल्या भोजनाच्या व्यवस्थेची पाहणी केली आहे. अम्मा कँटिनद्वारे हे भोजन गरजूंपर्यंत मोफत पोहोचविले जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अतिवृष्टीशी सबंधित दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. चेन्नईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील 13 सबवेमधील पाणी काढण्यात आले असून रस्त्यांवर कोसळलेले 160 वृक्षही हटण्यात आले आहेत. मागील 4 दिवसांमध्ये राज्यात 20 लाख लोकांना अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली आहेत.
आणखीन दोन दिवस संकट
हवामान विभागानुसार तामिळनाडूत पुढील 2 दिवसांपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. चेन्नई विमानतळावरील विमानसेवा यामुळे रोखण्यात आली होती. तामिळनाडूच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अतिवृष्टी पाहता थूथुकुडी, विल्लीपुरम, तिरुनेलवेली, नागापट्टणम, कुड्डालोर आणि चेंगलपेट्टू जिल्हय़ांमध्ये पूराचा इशारा दिला आहे.
9 जिल्हय़ांमधील शाळा बंद
हवामान विभागाच्या इशाऱयानंतर राज्य सरकारने गुरुवारी चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर, चेंगलपेट, कुड्डालोर, नागापट्टणम, तंजावुर, तिरुवरुर आणि मयीलादुथुराई जिल्हय़ांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी घोषित केली आहे.