352.99 कोटी निधी मंजूर – नुकसानग्रस्तांना दिलासा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांसाठी राज्य सरकारने मदत देण्याकरिता अनुदान जाहीर केले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांना तातडीची मदत आणि घरांची पडझड झालेल्यांना एसडीआरएफ निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. याकरिता सरकारने 352.99 कोटी रुपये जिल्हाधिकाऱयांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश संबंधित खात्याला दिला आहे. बेळगाव जिल्हय़ासह उत्तर कर्नाटकातील नुकसानग्रस्तांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
बेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड, रायचूर आणि यादगीर जिल्हय़ांमध्ये यंदा 22 जुलै ते 26 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. महाराष्ट्रातील जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ांना पुराचा फटका बसला. त्याचप्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात गुलबर्गा आणि बिदर तसेच मलनाड भागातील काही प्रदेशात पावसामुळे हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 99 तालुक्यांना अतिवृष्टीबाधित/पूरग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आले होते. या भागात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या मार्गसूचीनुसार तसेच राज्य सरकारकडून भरपाई व मदतीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
पाऊस किंवा पुरामुळे नुकसान झालेल्यांना गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी एकूण 10 हजार रुपये, घराची 75 टक्क्यांपेक्षा अधिक पडझड झाल्यास 5 लाख रुपये, घराची 25 ते 50 टक्क्यांपर्यंत हानी झाल्यास 3 लाख रु. आणि 15 ते 25 टक्क्यांपर्यंत हानी झाल्यास 50 हजार रुपयांची मदत देण्याची सूचना केली आहे. याकरिता सरकारने 352.99 कोटी रुपये जिल्हाधिकाऱयांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश संबंधित खात्यांना दिला आहे.
यंदा राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार राज्यात 1,05,370 कुटुंबांचे नुकसान झाले आहे. तर 2,228 घरे पूर्णपणे कोसळली. 6,309 घरांचे 25 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे 1,02,245 घरांची किरकोळ हानी झाली आहे.