महसूल मंत्री आर. अशोक यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
यंदा देखील अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. काही जिल्हय़ांमध्ये पावसाचा जोर ओसरलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कर्नाटकातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आगाऊ 395.5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. एसडीआरएफ निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी निधी मंजूर करावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली होती. या विनंतीला केंद्र सरकारने त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला असून 395.5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यात पाऊस आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील पंतप्रधानांकडे सादर करण्यात आला होता. याबाबत अलिकडेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली होती. याप्रसंगी आगाऊ 4 हजार कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती केली होती, अशी माहिती मंत्री आर. अशोक यांनी ट्विटरवर दिली होती.