रेल्वेगेट उघडेपर्यंत सर्वांचा जीव टांगणीला
प्रतिनिधी /बेळगाव
‘अति घाई संकटात नेई’ या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. एका कारचालकाने रेल्वेगेटनजीक घाई केल्यामुळे त्याचा हा बेजबाबदारपणा त्याच्यासह त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या खाईत लोटणारा होता. सुदैवाने अपघात टळला असला तरी असे प्रकार करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा विचार तरी करावा, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होती.
टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट येथे बुधवारी रात्री गेटचा सायरन वाजल्याने वाहनचालकांची धावपळ सुरू होती. गेट खाली पडणार इतक्मयात एका कारचालकाने चारचाकी घुसवली. गेटबंद झाल्यानंतर काही क्षणातच रेल्वे आली. त्यामुळे वाहनचालकाने गडबडीने दुसऱया बाजूच्या गेटजवळ कार थांबविली. यामुळे थांबलेल्या वाहनचालकांची घाबरगुंडी उडाली.
दुसऱया बाजूच्या रूळावरून अन्य रेल्वे आली असती तर मोठा अपघात घडला असता. त्या कारमध्ये चालकासोबत कुटुंबीयही होते. रेल्वेगेट उघडेपर्यंत या सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. कारचालकाच्या बेजबाबदारपणाचा फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे असा जीव धोक्मयात घालण्यापूर्वी किमान एकदा तरी विचार करावा.