गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून विरोधक लक्ष्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मल्हनी मतदारसंघातील नौपेडवांमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना अनेक मुद्दय़ांना स्पर्श केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सीमा आणि सैन्यावर डोळे वटारणाऱयांना शिक्षा मिळवून दिली आहे. काश्मीरप्रकरणी समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपने 70 वर्षांपर्यंत मौन बाळगले. भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 हटवून काश्मीरला कायमस्वरुपी भारताचा हिस्सा केल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
काश्मीरसाठीचे कलम 370 हटविल्यास पूर्ण देशात रक्ताचे पाट वाहतील असे अखिलेश यादव म्हणायचे. रक्ताचे पाट वाहणे सोडाच, साधा दगडही हातात घेणारा कुणी नव्हता. मोदींनी देशाची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. पाकिस्तानातून येणारे आलिया, मालिया आणि जमालिया दहशतवादी हल्ले करायचे तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह मौन धारण करायचे. परंतु आता पंतप्रधान मोदींनी याचे प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत विरोधकांच्या दहशतवाद्यांचा नाश केला आहे. उत्तरप्रदेशातून माफियांना समाप्त करण्यात आले आहे. अतीक, मुख्तार आणि आझम आता कुठे आहेत अशी विचारणा जनतेला करत शाह यांनी अजून काही माफिया मोकळे असून त्यांनाही तुरुंगात डांबणार असल्याचे नमूद केले आहे.
उत्तरप्रदेशला माफियामुक्त करविण्यासह राजकारणालाही गुन्हेगारीकरणापासून मुक्त करविण्यात येणार आहे. अखिलेश यादव यांना उत्तम कायदा-सुव्यवस्था दिसणार नाही, कारण त्यांच्या डोळय़ांवर काळा चष्मा चढलेला आहे. काळा चष्मा घालणाऱयांना सर्वकाही काळेच दिसते. योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात गुन्हय़ांचे प्रमाण घटले आहे. हत्या, लूट आणि दरोडा तसेच बलात्काराच्या घटना मोठय़ा प्रमाणात कमी झाल्या आहेत. गुन्हेमुक्त उत्तरप्रदेशच्या दिशेने राज्याचा प्रवास सुरू असल्याचे शाह म्हणाले.