सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत, आठवडय़ाचे सर्व दिवस
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्यात आला असल्याने जिल्हय़ात शनिवार व रविवार या दोन दिवशी अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केले आहे.
कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हय़ासह संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र शासनाने हे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. 5 जूनपासून जे जिल्हे चौथ्या, पाचव्या टप्प्यात आहेत, अशा जिल्हय़ांमध्येसुद्धा काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग चौथ्या टप्प्यात येत असल्याने सर्व अत्यावश्यक सेवा आठवडय़ाचे सर्व दिवस सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असणार आहे. यापूर्वी काढलेल्या आदेशामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक व वैद्यकीय सेवेसह जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, तर शनिवार, रविवारी केवळ वैद्यकीय कारणांसाठी लोकांना बाहेर पडता येणार आहे, असे नमूद करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी जिल्हाधिकाऱयांनी पुन्हा नवीन आदेश काढले असून यामध्ये शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे. त्या व्यतिरिक्त संचारबंदी असणार आहे.
यापूर्वी काढण्यात आलेल्या आदेशांमध्ये वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व दुकाने शनिवार रविबार बंद राहतील असे नमूद केले होते. मात्र शुक्रवारी या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याशी व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांनी संपर्क साधला असता शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे जिल्हय़ात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नवीन आदेश काढले असून यात शनिवार-रविवारीही अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. तसेच शनिवार व रविवारी अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना प्रवास, संचार करता येणार नाही, असे म्हटले आहे.