प्रतिनिधी / घुणकी
कोल्हापूर जिल्हयाचा सीमा तपासणी नाक्यावर प्रवास परवाना पत्र असतानाही जिल्हाबंदीचे कारण सांगून परत पाठवले जात आहे. यामुळे जिल्हा सीमा भागात राहणारे कर्मचारी आपल्या कर्तव्यापासून दूरच असलेचे चित्र आहे. कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडक लॅाकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वाहने यांना यातून सूट दिली असतानाही जिल्हाबंदीचे कारण सांगत प्रवेश नाकारला जात आहे.
सांगली जिल्हयातील कर्मचारी यांचेकडे वाळवा, शिराळा येथील तहसील कार्यालयाकडून घेतलेला प्रवास परवाना पत्र असतानाही त्यांना प्रवेश दिला जात नाही. तर कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी या सीमावर्ती तालुक्यातील तहसील कार्यालयात पर जिल्हयातील प्रवासाच्या परवान्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवले जात आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकिय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांना या आपत्ती काळात इच्छा असूनही सेवेपासून वंचित राहवे लागत आहे. तर उच्च पदस्थ अधिकारी यांना मात्र जिल्हा बंदीचा कायदा नाही. फक्त ये-जा करणाऱ्या कर्मचार्यांचीच अडवणूक होत असलेचे चित्र दिसत आहे. तर या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याचा सल्ला देत परत धाडले जात आहे. या कर्मचाऱ्यांना लॅाकडाऊनच्या काळात कामाच्या ठिकाणी जेवण व राहण्याची मोठी अडचन असताना त्यांना अशा प्रकारचे सल्ले दिले जात आहेत.
एकंदरीत कोरोनाच्या आपत्तीच्या परस्थितीत काम करण्याची तळमळ असूनही या कर्मचाऱ्यांना सेवेपासून लांब राहवे लागत आहे. याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून मार्ग काढण्याची मागणी सध्या हे कर्मचारी करत आहेत.