अतिथी राजा अत्यंत उदार होता. प्रजेत आणि सचिवांमध्ये त्याच्याबद्दल आदर होता. अतिशय न्यायी होता. भांडणतंटे सोडवण्यासाठी तो स्वतः धर्मासनावर बसून न्याय देत असे. ‘शौर्यरहित नीती आणि नीतीशिवाय शौर्य पशुवत् आहे’ असे त्याचे मत होते. म्हणून अतिथीराजा नीती आणि शौर्य यांचे पालन करणारा होता. तो नेहमी मंत्र्यांबरोबर सल्लामसलत करत असे. ती गुप्त असे. त्याने साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून राज्य चालवले. तो चक्रवर्ती राजा बनला.
अशा प्रकारे रघुवंशातील राजांनी बालवयात सर्व विद्या शिकून यौवनात सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेतला. वृद्धावस्थेत वानप्रस्थाश्रम पत्करला. काही राजांनी योगमार्गाने देहत्याग केला. अशा प्रकारे रघुवंशातील राजांनी योग्य प्रकारे राज्य आणि प्रजेचेही पालन केले.
अतिथी राजानंतरचा विसावा राजा सुदर्शन होता. तो स्वतःच्या मुलाला.. अग्निवर्णाला राज्याभिषेक करून तपश्चर्या करण्यासाठी निमिषारण्य नावाच्या वनात गेला. त्या ह्या रघुवंशातील अग्निवर्ण हा सर्वात वाईट राजा निपजला. त्याला म्हणे लोक भेटायला यायचे तेव्हा तो दोन्ही पाय खिडकीतून बाहेर काढून दाखवत असे. अत्यंत भोगविलासी, लंपट अशा ह्या राजाने सारे आयुष्य अंतःपुरात स्त्रियांच्या सहवासात घालवले. पुढे अर्थातच त्याला रोग जडले. शेवटी क्षयरोगाने त्याला ग्रासले आणि तरूणपणीच तो मेला. वाईट गोष्ट म्हणजे त्यावेळी त्याची पत्नी गर्भवती होती. राजसिंहासन रिकामे राहू नये म्हणून पोटातील गर्भावरच सचिवांनी राज्याभिषेक केला. तेव्हा राणीने सचिवांच्या सहाय्याने प्रजेचे पालन केले.
एकदा सीतेला कौसल्या म्हणाली होती की, पूर्वी सुखाचा अनुभव घेऊन पुढे पतीवर संकट ओढवल्यास पत्नीने त्याला दूषणे देणे आणि त्याचा त्याग करणे हा दुष्ट स्त्रियांचा स्वभाव आहे. त्यावर सीता मार्मिकपणे तिला उत्तर देते की,
‘धर्माद्विचलितुं नाहममलं चंद्रादिव प्रभा।’ चंद्र आणि त्याची प्रभा जशी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे व्यक्तीनेही धर्मापासून वेगळे होता कामा नये. त्याने नेहमी धर्माचरणच करावे म्हणजे जगात सुखशांती नांदेल!
अग्निवर्णाने न्याय, नीती, धर्म सारेच सोडले, मग त्याच्या राज्यात सुखशांती कशी नांदणार? रघुकुलातील आधीच्या सर्व राजांनी जे मोठय़ा मेहनतीने कमावले ते अग्निवर्णाने त्याच्या कर्माने काही वर्षातच गमावले. रघुकुळाच्या नावाला कलंक लावला आणि तो रघुवंशाच्या ऱहासाला कारणीभूत ठरला!
।। श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये।