विश्वामित्रांबरोबर गेलेल्या रामलक्ष्मणांनी ताटका वध केल्यानंतर ऋषीमुनींनी केलेले यज्ञकार्य निर्विघ्नपणे यथासांग पार पडले. त्यानंतर ते विश्वामित्रांबरोबर प्रवास करीत मिथिला नगरीजवळ येऊन पोचले. तिथे त्यांना एक जुनाट, निर्जन पण सुंदर आश्रम दिसला. त्याबद्दल दोघांनी प्रश्न विचारले असता विश्वामित्रांनी त्यांना माहिती दिली. तो आश्रम गौतममुनींचा होता. ते आपली पतिव्रता आणि अनुपम सौंदर्यवती अशा अहल्या नावाच्या पत्नीबरोबर दीर्घकाळ तिथे रहात होते. तपस्या करीत होते. अहल्या ही हिंदू संस्कृतीतील पहिल्या पाच पतिव्रतांपैकी पहिली होती. तिच्या अनुपम सौंदर्याची भुरळ इंद्र, वरुण, अग्नी यांनाही पडली होती. ती ब्रह्मदेवांची मानसकन्या आणि त्यांचीच निर्मिती होती. पृथ्वीवर तिच्याइतकी लावण्यखणी कोणी नव्हती. ब्रह्मदेवांकडून तिच्यावर चारित्र्यसंपन्नतेचे संस्कार झाले होते. त्यामुळे तिने गौतमांबरोबर असंख्य संवत्सरे सुखाचा संसार केला.
पण…या सौंदर्यवतीवर इंद्राचा डोळा होता. तिला आपलीशी करण्याचे त्याचे अनेक प्रयत्न फसले. पण एकदा त्याला संधी मिळाली. गौतम ऋषी काही कामानिमित्ताने बाहेर गेले असता, त्यांचाच वेष घेऊन इंद्र तिथे आला. परंतु एका बेसावध क्षणी तपःपूत गौतमांबरोबर संसार केलेली अहल्या इंद्राच्या त्या रूपाला फसली आणि त्याच्या वासनेची बळी ठरली. तिला त्याचे खरे रूप कळल्यावर ती घाबरली. गौतममुनी परत आल्यावर त्यांना खरे काय ते कळणारच. मग आपली अवस्था काय होणार या विचाराने ती अस्वस्थ झाली. इंद्र देवाधिदेव असूनही त्याच्याकडून मोठाच अपराध घडला होता. म्हणतात ना, कामातुराणां न भयं न लज्जा। त्याची शिक्षा अंतर्ज्ञानी गौतमांकडून त्यालाही मिळणारच होती.
आपल्या हातून पतीची प्रतारणा झाल्याचे लक्षात येताच ती इंद्राला म्हणाली, आत्मानं च मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात्… ‘सुरश्रे÷ा, गौतम मुनींपासून आपण स्वतःचे आणि माझेही रक्षण करा’. रामायणात रामाच्या जन्माच्याही आधी अहल्येकडून घडलेल्या या प्रमादाबद्दल गौतममुनी तिला ‘दुर्मेधा’ असे दूषण देतात. आश्रमातून आपल्याच वेषातील इंद्राला पाहून गौतमांच्या सारा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तोंडून सहजपणे शापवाणी बाहेर पडली. ‘हे दुर्बुद्धे, माझ्या वेषात येऊन तू जे निंद्य कृत्य केले आहेस, त्याअर्थी तू ‘वृषणरहित’ होशील.’ तक्षणी इंद्राचे वृषण गळून पडले. तर अहल्येला ‘तू हजारो वर्षे केवळ वायूभक्षण करून या राखेत पडून राहशील. जेव्हा दशरथपुत्र राम इथे येईल, तेव्हा हे दुराचारिणी, त्याच्या आदरातिथ्याने शुद्ध होशील आणि त्यानंतर स्वतःचे रूप धारण करून तू आनंदाने माझ्याकडे राहशील!’ असा शाप दिला. अहल्या हजारो वर्षे ते दुःख भोगत तिथे शिळेसारखी पडून राहिली.