प्रतिनिधी/ पणजी
डॉ. प्रमोद सावंत सरकारने अदानींच्या फायद्यासाठी जी पाऊले उचललेली आहेत, त्याच्याविरूद्ध गोमंतकीय जनता गेले काही महिने लढा देत आहे. पण, सरकारने लाखो गोमंतकीयांच्या आवाजाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून त्यांच्या विरोधाला काडीचीही किंमत दिलेली नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे सुरेल तिळवे यांनी पत्रकार परीषदेत केला.
गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय गोमंतकीयांच्या हिताचा घेतलेला नाही. गोव्यातील जंगले, वनप्रदेश, पर्यावरण आणि नैसर्गिक स्रोत यावर गोमंतकीयांचा हक्क असून गोमंतकीयांना विश्वासात न घेताच अनेक प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. सर्वसामान्य लोकांपेक्षा एका व्यावसायिक उद्योगसमूहाच्या व्यावसायिकाचे स्वार्थ या सरकारला महत्वाचे वाटते. डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला केंद्र सरकारच्या स्वार्थासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे वापरले आहे. गोवेकरांचा आवाज या सरकारला ऐकु येत नाही का ? असा प्रश्न श्री. तिळवे यांनी यावेळी उपस्थित केला.
गोव्यातील जनतेला 24 तास आठवडय़ाचे सातही दिवस अखंडित वीज पुरवठा मिळालेला नाही पण उच्च दाबाच्या वीज वाहिन्या लोकांच्या घरावरून नेण्यात येतात आणि या गावामधील लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो याचाही विचार हे सरकार करत नाहीत. गोव्यात खाणी आणि शाश्वत खाण व्यवसाय गोवेकरांना नोकऱया देण्यासाठी सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने काहीही गंभीर पाऊले उचललेली नाहीत, पण अदानींना गोव्यात जे हवे आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काहीही करायला तयार आहेत, असेही श्री. तिळवे यांनी यावेळी सांगितले.
गोवेकरांच्या जीवनावर आणि पर्यावरणावर या कोळसा प्रकल्पाचा वाईट परिणाम होणार आहे. काहींच्या खाजगी फायद्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेणे यात काहीतरी अर्थ आहे का ? जगभरातील अनेक देश आज कोळसामुक्त होत आहेत कारण कोळसा हा अतिशय अशुद्ध वा घाणेरडा ऊर्जा स्रोत आहे. परंतु हे सरकार गोमंतकीयांचे जीव अदानींसाठी धोक्यात घालायला तयार आहे, असा आरोप तिळवे यांनी यावेळी केला.