प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंधासाठी प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन मोठी रुग्णालय, वसतीगृह शोधून कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटर तयार आहेत. त्यातील सुविधा अद्ययावत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱयांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रविवारी या सर्वांशी संवाद साधला. तसेच जिल्हाधिकाऱयांनी प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱयाकडून आढावा घेतला.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, दिल्लीवरुन आलेल्यांपैकी काही व्यक्ती चुकून राहिल्या असतील तर त्यांना शोधून त्यांची सक्तीने तपासणी करा. त्यांचा स्वॅब घेतला आहे का, याचीही खात्री करा. त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी होण्यासाठी दक्षता घ्या. अजूनही काही ठिकाणी बाहेरुन लोक येत आहेत, अशा तक्रारी आहेत. अशांना सक्तीने इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन करा. संस्थात्मक अलगीकरण केंद्र, निवारा शिबिरांत शासनामार्फत सुविधा पुरवल्या पाहिजेत. साखर कारखाना स्तरावरील कामगार शिबिरांमध्ये कारखान्यांनी सुविधा पुरवायच्या आहेत. अशा ठिकाणी भेटी द्या, तेथे दिल्या जात असलेल्या सुविधा वैयक्तिकरित्या तपासून अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.
ग्रामीण भागात काटेकोरपणे सर्वेक्षण करा
ग्रामस्तरावर बाहेरुन आलेल्यांची माहिती अद्यापी अपूर्ण आहे ती ग्राम समितीच्या संपर्क अधिकाऱयाकडून तात्काळ भरुन घ्या. मुख्याधिकाऱयांनीही प्रभाग समितीच्या संपर्क अधिकाऱयांची माहिती द्यावी. पॉझिटिव्ह रुग्णांबाबत त्याच्या प्रवासाच्या इतिहासाची बारकाईने नोंद घ्या. तो कुठे गेला, कसा आला, कुणाला भेटला आदी माहिती द्यावी. आरोग्यसेवक, आशा वर्कर, एएनएन, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून काटेकोरपणे सर्व्हेक्षण करा. त्यावर तहसिलदार, गटविकास अधिकाऱयांनी नियंत्रण ठेवावे. नवीन इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन केंद्रांसाठीही ठिकाणे शोधावीत. कोविड हॉस्पिटलच्या जवळपास ही ठिकाणं असावीत, असे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भूसंपादन अधिकारी डॉ. हेमंत निकम आदी उपस्थित होते.
रेशन दुकानात गर्दी करू नये
ग्रामीण भागात धान्य वाटप सुरु आहे. तेथे गर्दी होणार नाही. सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता घ्या. केसरी कार्डधारकांनाही मे-जूनमध्ये धान्य पुरवठा होणार आहे. तो सुरळीत राहील, हे पहावे. शेतीच्या कामाला अडवू नका ती सुरळीत चालू राहतील्। याची दक्षता घ्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या.