पश्चिम बंगालमध्ये राजकीय स्पर्धा शिगेला, बॅनर्जी नंदिग्राममधून मैदानात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून विधानसभा निवडणूक लढविली तर त्यांचा किमान 50 हजार मतांनी पराभव होईल, असा इशारा तृणमूल काँगेसमध्ये बंड गरून भाजपमध्ये आलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे. या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाही, तर आपण राजकारणाचा त्याग करू असे आव्हानही त्यांनी दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची रीतसर घोषणा होण्यापूर्वीपासूनच राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
तत्पूर्वी ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपण नंदिग्राममधून अर्ज सादर करणार आहोत अशी सनसनाटी घोषणा केली. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा आहे. त्यामुळे बॅनर्जी यांनी अधिकारी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच आव्हान दिले आहे, अशी चर्चा होत आहे. मात्र, अधिकारी यांनीही त्यांना पराभूत करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.
ममता बॅनर्जी सध्या दक्षिण कोलकत्यातील भवानीपूर मतदानसंघाच्या आमदार आहेत. यंदा आपण भवानीपूरसह नंदिग्राममधूनही निवडणूक लढवू अशी घोषणा त्यांनी सोमवारी केली. कदाचित आपण केवळ नंदिग्राममधून मैदानात उतरू असेही वक्तव्य त्यांनी केले. त्यावर अधिकारी यांनी त्यांना जिंकून दाखविण्याचे आव्हान दिले. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये निर्णायक संघर्ष होण्याची शक्यता आहे.
नंदिग्रामचे महत्व काय
ममता बँनर्जी यांनी 2011 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदिग्राम येथूनच डाव्या आघाडीविरोधात निर्णायक संघर्षाचे रणशिंग फुंकले होते. या संघर्षाचे नायकत्व अधिकारी यांच्याकडे होते. त्यांनी येथे जनजागृती करून बॅनर्जी यांच्या आंदोलनाला अनुकूल वातावरण निर्माण केले होते. नंदिग्राम येथे शेतकऱयांची भूमी उद्योगासाठी अधिग्रहित करण्याची योजना त्यावेळच्या डाव्या आघाडीच्या सरकारची होती. त्याविरोधात राज्यभर असंतोषाचा भडका उडाला होता. या असंतोषाचा प्रारंभ नंदिग्राम येथून झाला होता. आता याच नंदिग्राममधून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निर्णायक संघर्षाची तयारी अधिकारी यांनी केली आहे.