पोलीस अधिकारी-खबरी साटेलोटे : अवैध ऐवजावर परस्पर डल्ला, गुप्त माहिती देणारे हे खबरी किंवा पंटरच,
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या पोलिसांचे खबरे फक्त ‘टिप’ देऊन गप्प बसत नाहीत. तर जप्त करण्यात आलेला बेकायदेशीर ऐवज पोलीस अधिकाऱयांशी संगनमताने परस्पर हडप करण्यापासून ते त्या मालाच्या सोडवणुकीसाठी मांडवली करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काही प्रकरणात अधिकारी यशस्वीही झाले तर काही प्रकरणात स्वतःची पोळी भाजून घेण्याच्या नादात अनेक अधिकाऱयांनी हात पोळून घेतल्याचेही प्रकार घडले.
गुन्हेगारी प्रकरणांचा तपास असो किंवा अमली पदार्थ, सोने-चांदीची तस्करी प्रकरणे असोत. अशा प्रकरणांची माहिती पोलीस दलाला कोण देतो, हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. परंतु पोलीस अधिकाऱयांना व्यवस्थितपणे आपले कर्तव्य बजावण्यासाठी अनेकांची मदत मिळते. त्यात खबरी किंवा पंटर यांची भूमिका महत्त्वाची असते. अनेकवेळा सांकेतिक भाषेत खबरींकडून मिळणाऱया संदेशांमुळे मोठे गुन्हेगार अलगदपणे पोलिसांच्या जाळय़ात अडकतात.
पोलीस अधिकाऱयांना आपले काम अधिक नीटनेटकेपणाने व्हावे यासाठी खबऱयांचे जाळे तयार करावे लागते. सर्वसामान्य नागरिक आपल्या परिसरात चालणाऱया गुन्हेगारी कारवायांविषयी एका काळजीपोटी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पोलीस दलाला माहिती देतात. तर खबरी किंवा पंटरना प्रत्येक माहितीसाठी बक्षीस द्यावे लागते. खबरींची दुनियाच वेगळी असते. व्यावसायिक खबरींचे जाळे गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवून असते.
अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणल्यानंतर पोलीस अधिकारी गूढरीत्या त्याची माहिती देतात. आम्हाला गुप्त माहिती मिळाली म्हणून आम्ही ही कारवाई केल्याचे अधिकारी सांगतात. त्यांना गुप्त माहिती देणारे हे खबरी किंवा पंटरच असतात. त्यांची नावे नेहमी गुप्त ठेवली जातात. बेळगाव परिसरात खबऱयांचे सुनियोजित जाळे नसल्यामुळे अनेक गुन्हेगारी कारवाया सुरू असूनही पोलीस दलापर्यंत त्या पोहोचत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
खबरींकडून अधिकाऱयांना ‘टिप’
पोलीस किंवा अबकारी अधिकाऱयांकडून अधूनमधून मोठय़ा प्रमाणात बेकायदा दारू जप्त केली जाते. खासकरून गोव्याहून या दारूची वाहतूक केली जाते. कणकुंबीजवळ अबकारी तपास नाक्मयावर वाहने अडवून दारू जप्त केली जाते. मात्र, याच वाहनातून मोठय़ा प्रमाणात दारूची वाहतूक होत आहे, याची ‘टिप’ खबरींकडून अधिकाऱयांना मिळालेली असते. म्हणून त्याच वाहनाची अचूकपणे तपासणी केली जाते.
सोन्या-चांदीच्या तस्करीची माहितीही मिळते खबरींकडूनच
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोन्या-चांदीची मोठय़ा प्रमाणात तस्करी चालते. यापूर्वी अनेकवेळा सोन्या-चांदीच्या विटा, दागिने जप्त करण्यात आले आहेत. अलीकडेच यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात पाच किलो सोने चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनीच हे सोने चोरल्याचा आरोप आहे. सध्या हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. या सोन्याचा व्यवहारही खबरीकडून मिळालेल्या माहितीवरूनच झाला आहे.
मांडवली करण्याचे प्रकार वाढीस
कोल्हापूरहून तामिळनाडूला सोन्या-चांदीची वाहतूक होते किंवा तामिळनाडूहून कोल्हापूर-सांगलीला तयार दागिने पाठविले जातात. कर चुकविण्यासाठी हा सारा आटापिटा असतो. ही गोष्ट पोलीस दलातील अनेक अधिकाऱयांना माहितीची आहे. पूर्वी एखादे वाहन सापडल्यानंतर संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करून ते दागिने जप्त केले जात. आता खबरीचे काम करणाऱया पोलिसांच्या हस्तकांना हाताशी धरून पोलीस स्थानकात येण्याआधीच मांडवली करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असे प्रकार काही पोलीस अधिकाऱयांना अंगलटही आले आहेत.
पंधरा वर्षांपूर्वी काकती पोलिसांनी चांदी वाहतूक करणारे वाहन पकडले होते. ते वाहन पोलीस स्थानकात न आणता परस्पर डोंगरावर नेण्यात आले. चांदीमालकाशी संपर्क साधून पैशांची मागणी करण्यात आली. ‘अमूक रक्कम दिली तरच तुमचे वाहन व चालकाची सुटका करतो’, असे सांगण्यात आले. संबंधित मालकाने काकती पोलिसांकडे धाव घेतली. तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख हेमंत निंबाळकर यांनाही घटना कळविण्यात आली. शेवटपर्यंत वाहन पळविणारे पोलीसच आहेत, याचा उलगडा झाला नव्हता. अखेर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह चौघा जणांना अटक करण्यात आली होती.
स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक अधिकाऱयांनी बाळगलेत खबरी
खबऱयांच्या प्रतापामुळेच हा प्रकार घडला होता. सध्या बेळगाव शहर व जिल्हय़ात असे प्रकार सुरू आहेत. खबरी, पंटर, हस्तक आणि पोलीस अधिकारी यांच्या संगनमतामुळे अनेक प्रकरणे पोलीस स्थानकापर्यंत पोहोचत नाहीत. परस्पर मोठी रक्कम घेऊन मांडवली केली जात आहे. हस्तकांबरोबरची दोस्ती काही वरि÷ अधिकाऱयांना चांगलीच भोवली आहे. बेळगाव उत्तरचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांची सरकारला अशाच प्रकरणात तडकाफडकी बदली करावी लागली, यावरून खबरी आणि हस्तकांची पोच कुठेपर्यंत आहे? याची कल्पना यावी. एक काळ असा होता, की गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यासाठी अधिकारी खबऱयांची मदत घेत होते. आता स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक अधिकाऱयांनी खबरी बाळगले आहेत.
व्यावसायिक स्पर्धेतून मटका-जुगारी अड्डय़ांवर कारवाया
मटका, जुगारी अड्डय़ांवरील कारवाईही अनेकवेळा खबरींनी दिलेल्या माहितीवरून केली जाते. आता व्यावसायिक स्पर्धेतून मटका-जुगारी अड्डय़ांवर कारवाया होतात. एखाद्याचा व्यवसाय जोरात सुरू असेल तर व्यवसायातील त्याचा स्पर्धक पोलिसांना त्याची ‘टिप’ देतो. कारवाई करणारे अधिकारीही अवैध धंद्यात गुंतलेल्यांना आपणाला कोणाकडून ‘टिप’ मिळाली, हे काही वेळा मुद्दामहून उघड करतात. यामागे या समाजकंटकांचा परस्पर काटा काढण्याचा डाव असतो आणि काही प्रकरणात आर्थिक हितसंबंधही दडलेले असतात. व्यावसायिक स्पर्धेतून गैरधंद्यांची माहिती पुरविणाऱयांची संख्याही मोठी आहे. मटका, जुगाराबरोबरच हवाला व्यवसायासंबंधीही व्यावसायिक स्पर्धेतून माहिती पुरविली जाते. खबरींचा वापर करून गुन्हेगारी टोळय़ांच्या मुसक्मया आवळण्यापेक्षा अशा प्रकरणातून आपला काही फायदा होतो का? याचा विचार करणाऱयांची संख्याच फोफावताना दिसत आहे.