सर्वसामान्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष : मनपा-स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांकडून जबाबदारी झटकण्याचे
प्रतिनिधी/ बेळगाव
अधिकाऱयांच्या टोलवाटोलवीच्या उत्तरांमुळे बेळगावची जनता हैराण झाली आहे. कोणत्याही समस्येबाबत अधिकाऱयांना कळविले असता मी बघतो, मी बोलतो, मी करतो, असे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात मात्र ना कोणी समस्येची दखल घेते ना कोणाला त्याबद्दल सांगितले जाते. डेनेज, रस्ते, खड्डे, रस्त्यांवरील अंधार अशा मूलभूत समस्यांबाबत बेळगावचे कोणतेच अधिकारी गंभीर नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंडोळी रोडवर डेनेजचे पाणी तुंबून नागरिकांच्या कंपाऊंडमध्ये शिरले आहे. या दुर्गंधीमुळे परिसरात अनारोग्य निर्माण झाले असून, तेथे राहणे नव्हे तर थांबणेसुद्धा कठीण झाले आहे. सत्तरी उलटून गेलेल्या आजी गेल्या दहा दिवसांपासून महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना दररोज फोन करून ही समस्या दूर करण्यासाठी विनंती करत आहेत. मात्र, त्यांच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यापलीकडे दुसरे काहीही झालेले नाही.
या समस्येबाबत प्रत्येकजण हे आमच्या कक्षेत येत नाही, त्यांना सांगा, अशी उत्तरे देतो. दुसऱया अधिकाऱयास सांगितल्यास आम्ही येऊन बघतो इतकेच उत्तर मिळते. या भागातील ही नेहमीचीच समस्या होऊन बसली आहे. स्मार्ट सिटीच्या कामामध्ये सातत्याने डेनेज लाईन फुटण्याची ही आता पाचवी वेळ आहे. दरवेळी या आजी आणि इतर कुटुंबीयांना त्याचा निष्कारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहराला कोणी वाली आहे का?
दरम्यान, माध्यम प्रतिनिधींनी या समस्येबद्दल स्मार्ट सिटीचे संचालक शशीधर कुरेर यांच्याशी संपर्क साधता त्यांनी आपल्या अधिकाऱयांचे फोन नंबर देऊन संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर जवळजवळ 4 ते 5 जणांना फोन केल्यानंतर ही समस्या महानगरपालिकेने निर्माण केली आहे, आमचा त्याच्याशी संबंध नाही. महानगरपालिकेलाच याबाबत कळवावे, असे सांगण्यात आले. महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे या शहराला कोणी वाली आहे का, असाच प्रश्न नागरिक करत आहेत.
स्मार्ट सिटीच्या कारभाराबद्दल बेळगावकरांमध्ये तीव्र असंतोष
स्मार्ट सिटीच्या एकूण कारभाराबद्दल बेळगावकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंडोळी रोडवरची समस्या हे फक्त एक उदाहरण आहे. संपूर्ण शहरात थोडय़ाफार फरकाने हेच चित्र आहे. जशी डेनेजची समस्या तशीच झाडांची कत्तले, रस्ते दुरुस्ती, प्रत्येकजण त्याबाबत आपली जबाबदारी झटकत असून नेमकी झाडांची कत्तल कोणता विभाग करतो आहे, याबाबत नागरिकांनाच अंधारात ठेवले जात आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एकही झाड तोडले जाणार नाही, अपरिहार्य परिस्थितीत झाड तोडावे लागल्यास त्याचे प्रत्यारोपण करण्यात येईल, असे स्मार्ट सिटीचे संचालक शशीधर कुरेर यांनी सिटीझन्स कौन्सिलला सांगितले होते. तथापि, प्रत्यक्षात झाडांची कत्तल सुरूच आहे. शहरातील समस्या जैसे थे आहेत आणि नागरिकांचे हालही तसेच सुरू आहेत.