वार्ताहर/ चिकोडी
पावसाळा सुरु झाला असून महाराष्ट्रातील विविध धरणांतून कोणत्याही क्षणी कोणत्याही पूर्वसूचना न देता कृष्णा नदीस पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांनी सर्व ती पूर्वतयारी करावी. कृष्णेसह इतर नदीकाठावर महापुराला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी तयारीसह बोटी सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना पालकमंत्री तथा पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिल्या.
चिकोडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात मंगळवारी तालुकास्तरीय अधिकाऱयांच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. मंत्री जारकीहोळी म्हणाले, अधिकाऱयांनी महापुरात बुडणाऱया वाडय़ा, वस्त्या व गावांच्या स्थलांतरासाठी योग्य त्या ठिकाणांची तजवीज करावी. गतवर्षी महापुरामुळे अनेक जनावरे वाहून गेली. त्यासाठी यावेळी जनावरांच्या स्थलांतराविषयी योग्य ती तयारी ठेवा, असेही त्यांनी सांगितले. महिन्यानंतर पुन्हा अधिकाऱयांची बैठक घेतली जाईल. त्यावेळी सर्व माहितीनिशी अधिकाऱयांनी उपस्थित रहावे, अशा सक्त सूचना दिल्या.
आमदार महांतेश कवटगीमठ म्हणाले, गतवर्षी महापुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या लाभार्थ्यांना सरकारच्या घरकुल योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱयांनी लक्ष द्यावे. जैनापूर व खडकलाट बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनांचा लाभ सर्व गावांना मिळेनासा झाला आहे. त्यासाठी जीवजल योजनेंतर्गत योग्य अंदाजपत्रक तयार करण्यात यावे, असे सांगितले. शिवाय हेस्कॉमच्या अधिकाऱयांच्या कार्यप्रणालीविरोधात अधिकाऱयांना चांगलेच खडसावले.
प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णवर म्हणाले, चिकोडी उपविभागात महापुरामुळे बुडणाऱया गावातील लोकांसाठी 121 शाळा व कल्याण मंटप, समुदाय भवनांचे नियोजन करण्यात आले आहे. चिकोडी उपविभागासाठी 37 बोटींची आवश्यकता असून त्यापैकी 20 ते 27 बोटी भाडय़ाने घेण्यात येतात तर 17 बोटी दुरुस्तीसाठी आल्या आहेत, असे सांगितले.
साहाय्यक कृषी संचालक मंजुनाथ जनमट्टी म्हणाले, पीक विमा योजनेंतर्गत 2019-20 मध्ये 29 हजार शेतकऱयांनी विमा उतरविला आहे. आतापर्यंत 5.78 कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई आलेली आहे, असे सांगितले. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, दुर्योधन ऐहोळे, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही., ता. पं. अध्यक्षा उर्मिला पाटील, तहसीलदार एस. एस. संपगावी, डीएचओ शशिकांत मुन्याळ, साहाय्यक कृषी संचालक एल. आय. रुडगी, जि. पं. सदस्या लक्ष्मी कुरुबर, ता. पं. सदस्य रवींद्र मिरजे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
राजकीय प्रवास भाजपमध्येच संपणार
पत्रकारांनी विचारलेल्या पक्षांतरविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, माझी राजकीय प्रगती बघवेनासी झाल्यानेच विरोधक माझ्याबद्दल नको त्या बातम्या पसरवित आहेत. विरोधकांनी एकच लक्षात ठेवावे की, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझा राजकीय प्रवास भाजपमध्येच संपेल. कालावधी संपेपर्यंत येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे ते म्हणाले.