प्रतिनिधी / कोल्हापूर
पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड दोषी आहेत. त्यांची आडिओ क्लीप मधून स्पष्ट होत आहे. यांचा सरकारने गंभीरपणे विचार करुन राजीनामा घ्यावा, त्यांना अटक करावी, अन्यथा विधीमंडळ अधिवेशनात आघाडी सरकारला तोंड उघडून देणार नाही. असा खणखणीत इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकार जानिवपूर्वक चित्रा वाघ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. खुशाल चौकशी करा, असे आव्हानही त्यांनी आघाडी सरकारला दिले. सोमवारी युवा मोर्चाच्यावतीने राज्यभर आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, विजय अग्रवाल उपस्थित होते.
ते म्हणाले, स्वत:ला सत्यवादी समजणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे या प्रकरणात तोंड बंद का आहे. अशी विचारणा करीत महाविकास आघाडीतील सहा मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर तक्रारी आहेत. त्यांच्यावर का कारवाई केली नाही असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, पूजा चव्हाण यांचा खून कि आत्महत्या याचा उलघडा सरकारने अजूनही केला नाही. चव्हाण या मूळच्या बीडच्या असताना त्यांचा यवतमाळमध्ये गर्भपात कसा? घटना घडली त्यावेळी उपस्थित असणारे ते दोघे कुठे गायब झाले आहेत. कुणाच्या सांगण्यावरुन गायब झाले? डॉ. रोहिदास चव्हाण कुठे आहेत ? पोस्टमार्टम अहवाल कुठे आहे असे अनेक प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले. यासर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिली पाहिजेत. जनतेच्या मनात असलेला संभ्रम मुख्यमंत्र्यांनी दूर केला पाहिजे अशी मागणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारपर्यंत मंत्री राठोड यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची आजही तीच भूमिका आहे. असे एका प्रश्नावर स्पष्ट केले.
चित्रा वाघ वाघीण
पूजा चव्हाण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आवाज उठवित असल्याने सरकारने त्यांच्या पतीवर कारवाई केली आहे. हा प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही चित्रा वाघ या वाघिण आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे यांनी या चव्हाण प्रकरणी समाजाला उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.