मंत्री-अधिकाऱयांची वर्दळ : वाहनधारकांची होतेय गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नागरिकांबरोबर वाहनधारकांची वर्दळ वाढली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सुवर्णविधानसौधसमोर वाहनांची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना या कोंडीतून बाहेर पडताना कसरत करावी लागत आहे.
हिवाळी अधिवेशनामुळे आमदार-खासदार आणि मंत्र्यांची विधानसौधकडे ये-जा वाढली आहे. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच आंदोलक आणि इतर नागरिकांच्या वाहनसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. मंत्र्यांची वाहने असल्याने इतर वाहने थांबवली जात आहेत. त्यामुळे महामार्गासह सर्व्हिस मार्गावरदेखील वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. सकाळी मंत्री विधानसौधकडे जाताना आणि विधानसौधवरून सायंकाळी परतताना वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे खासगी वाहतूकदारांनादेखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.