सोमवारपासून दहा दिवस चालणार कामकाज
प्रतिनिधी\ पणजी
उद्या सोमवार दि. 11 पासून सुरू होणाऱया विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी तब्बल दोन हजारांपेक्षा अधिक प्रश्न मांडण्यात येणार आहेत. त्यात एकूण 574 तारांकित आणि 1587 अतारांकित प्रश्नांचा समावेश असेल.
आधी घोषणा केल्यानुसार हे अधिवेशन महिनाभर म्हणजेच दि. 12 ऑगस्टपर्यंत चालणार होते. परंतु मध्यंतरी उच्च न्यायालयाने दिलेल्या पंचायत निवडणुकीसंदर्भातील आदेशामुळे सरकारची पंचाईत झाली. त्यातून पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर करावी लागली व तेव्हापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. परिणामस्वरूप विधानसभा अधिवेशनावर मर्यादा आल्या. पंचायत निवडणूक आणि अधिवेशन कामकाज यासाठी लागणाऱया कर्मचारीवर्गाचा प्रश्न हा त्यातील महत्वाचा मुद्दा होता.
त्यामुळे सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात यावा, अशी विनंती विधानसभा कामकाज सल्लागार समितीकडे केली. सदर ग्राह्य तांत्रिक अडचण लक्षात घेऊन कामकाज समितीने ती विनंती मान्य केली व अधिवेशनचा कालावधी दहा दिवसांवर आणण्यास अनुमती दिली. त्यानुसार आता शनिवार, रविवार हे सार्वजनिक सुट्टय़ांचे दिवस वगळता हे अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. त्यातील पहिले दोन दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेसाठी असतील. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाज आठ दिवसच चालणार आहे. दि. 22 जुलै रोजी अधिवेशनाचा समारोप होईल.
या अधिवेशनात तारांकित आणि अतारांकित मिळून दोन हजारांपेक्षा जास्त प्रश्न मांडण्यात येणार आहेत. त्याशिवाय दहा खासगी आणि काही सरकारी विधेयकेही पटलावर येणार आहेत. त्यात खास करून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे बहुचर्चित ‘पोगो’ आणि आम आदमी पक्षातर्फे मांडण्यात येणाऱया ‘धिरयो’ या विधेयकांचा समावेश असेल.
युरी आलेमाव यांच्या 31 दुरुस्त्या
अधिवेशनात होणाऱया राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सुमारे 31 दुरुस्त्या सूचविल्या आहेत. त्यात राज्य हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या परंतु सरकारने दुर्लक्षित केलेल्या अनेक मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या दुरुस्त्या स्वीकारून राज्याच्या कल्याणासाठी सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, प्रदूषण, रोजगार, पॅसिनो यासारख्या राज्याची अस्मिता जतन करणाऱया महत्त्वपूर्ण मुद्यांचा त्यात समावेश आहे. त्याद्वारे सरकारचे अपयश अधोरेखित करण्यात आले आहे.