ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात केवळ पाचच दिवसात राज्य मंत्रिमंडळातील 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर शुक्रवारी दिवसभरात राज्यात 8067 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्बंध घातले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन आकडा आता 10 हजारांकडे वाटचाल करत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचेही रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी लोकांनी तारतम्य बाळगावे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. अधिवेशन काळात केवळ पाच दिवसात 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. ही रुग्णवाढ चिंताजनक आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीचे लोकप्रतिनिधींनीही भान ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.