“लॉकडाऊनमुळे फार प्रॉब्लेम आलाय,’’ एक तरुण आपल्या मित्राला फोनवरून सल्ला विचारत होता.
“काय झालं? जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना एखादी वस्तू विसरलास काय? हवी असेल तर सांग. मी लगेच पोचवतो. अशा वेळी मदतीला आला नाही तर तो मित्र कसला?’’
“नाही रे. ती समस्या नाही. मला किनई माझ्या मैत्रिणीला व्हीडिओ कॉल करायचाय. पण प्रत्येक खोलीत कोणी ना कोणी असतंच. बाथरूममध्ये, वॉशरूममध्ये जाऊन तिथून चोरून तिला फोन नेला तर लागत नाही. कारण तिथे रेंज नसते. बायको मला घराबाहेर जाऊ देत नाही.’’
“मैत्रीण कुठे राहते? तिचं नाव काय? लॉकडाऊन संपल्यावर तिच्याशी बोललास तर चालणार नाही का? तिच्याशी अगदी बोललंच पाहिजे का? मुख्य म्हणजे तिची तुझ्याशी बोलायची इच्छा आहे का?’’
“आमच्याच इमारतीत अमुक नंबरच्या सदनिकेत राहते ती. तिचं नाव तमुक आहे. आणि लॉकडाऊन संपल्यावर काय रे फायदा? तो कधी संपेल, कोणाला ठाऊक. एखाद्या वेळी करोनामुळे ती किंवा मी गेलो तर माझी इच्छा अपूर्ण राहू शकेल. तिची माझ्याशी बोलायची इच्छा आहे की नाही हे मला तिच्याशी बोलल्यावरच समजेल.’’
“अरेरे! फारच व्याकूळ झाला आहेस की रे तू. असं कर. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडलं तर पोलीस अडवत नाहीत. तू ते कारण सांगून बाहेर जा.’’
“पण आमच्याकडे सर्व जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत. कश्शाचीही कमतरता नाही. बायकोने सगळं व्यवस्थित काम केलं आहे.’’
“त्यातली एखादी वस्तू लपवून बघ. ती आणण्यासाठी तुला बाहेर पडता येईल.’’
“बायको लगेच ती वस्तू ऑनलाईन मागवील.’’
“यावर देखील एक हमखास उपाय आहे. पण काय रे? तुझी बायको इतकी गुणी असताना तुला मैत्रिणीच्या मागे लागताना शरम कशी वाटत नाही? करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायको तुला बाहेर जाऊ देत नाही. तुझी इतकी काळजी घेते आणि तू चक्क तिला फसवतोस?’’ “तू माझा मित्र आहेस की माझ्या बायकोचा?’’
“तुझाच मित्र आहे. पण तू मला तुझ्या तथाकथित मैत्रिणीचं नाव सांगितलंस तेव्हा मी चिडलो. कारण की ती मला सांगून आलीय आणि ही करोनाची गडबड संपल्यावर आम्ही विवाहबद्ध होणार आहोत.’’