‘सीडब्ल्यूसी’मध्ये ज्येष्ठ नेत्यांची आग्रही मागणी – विनंतीचा विचार करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2021 ला सुरू होऊन सप्टेंबर 2022 पर्यंत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल, अशी घोषणा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी ‘सीडब्ल्यूसी’च्या बैठकीत केली. मी 2019 पासून पक्षाची हंगामी अध्यक्ष आहे. पण आता अध्यक्षीय आणि पक्षातील इतर निवडणुका लवकरच होतील, असे त्यांनी जाहीर केले. तसेच पक्षातील नेत्यांनी प्रसारमाध्यमांमार्फत बोलण्याची गरज नाही, अशा कानपिचक्या त्यांनी जी-23 नेत्यांना लगावल्या. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सर्वसाधारण बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, अशी आग्रही मागणी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. याबाबत राहुल गांधी यांनीही सकारात्मकता दर्शवत ज्येष्ठ नेत्यांच्या मागणीचा विचार करू, असे म्हटले आहे.
दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यकारी समितीच्या बैठकीत शनिवारी पक्षाच्या रणनितीवर आणि संघटन बांधणीबाबत चर्चा झाली. या बैठकीतील अध्यक्षीय भाषणात सोनिया गांधी यांनी पक्षातील टीकाकारांना खडे बोल सुनावले. यावेळी गांधी यांचा रोख प्रामुख्याने पक्षपुनर्बांधणी आणि शिस्तपालन या बाबींकडे असल्याचे दिसून आले. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. सगळय़ांनी शिस्त पाळली आणि पक्षाच्या हिताचे काम केले तर आपण चांगले काम करू, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. या बैठकीत काँग्रेसचे 52 नेते उपस्थित होते. त्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि दिग्विजय सिंह अनुपस्थित होते.
माध्यमांच्या आडून माझ्याशी बोलू नका !
काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांकडून विचारल्या जाणाऱया प्रश्नांना सोनिया गांधींनी कार्यकारी समितीच्या बैठकीत स्पष्टपणे उत्तर दिले आहे. ‘मी पूर्णवेळ अध्यक्षा प्रमाणेच काम करत आहे’ असे सांगत पक्षाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विचार विनिमय करताना माध्यमांच्या आडून माझ्याशी बोलू नका. आपण खुली आणि मनापासून चर्चा करूया, मात्र या चर्चेचा तपशील बाहेरच्यांना किती सांगावा याबाबतचा निर्णय काँग्रेसची कार्यकारी समिती घेईल’ असे सोनिया गांधी यांनी ठणकावले.
काँग्रेसमध्ये जी-23 नावाचा एक गट तयार झाला असून हा गट काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल व्हावा या विचाराचा आहे. या गटाचे कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत काँग्रेसमध्ये निर्णय कोण घेत हेच कळत नाही असे म्हटले होते. सोनिया गांधी यांचे आजचे विधान हे सिब्बल आणि त्यांच्या मतांशी सहमत असलेल्या काँग्रेस नेत्यांना उद्देशून करण्यात आल्याचा अंदाज बांधला जात आहे.
मोदी सरकारवर निशाणा
कृषीविषयक कायद्यांच्या माध्यमातून मोदी सरकारकडून शेतकऱयांचा छळ सुरू असल्याचा निशाणाही सोनिया गांधी यांनी बैठकीत साधला. तसेच भाजपच्या सत्ताकाळात अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून महागाईचा आगडोंब उसळला आहे. तसेच भाजपच्या कार्यकाळात गैर-भाजप राज्य सरकारांवर अन्याय झाल्याचा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधीनी अध्यक्ष व्हावे !
सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. तोपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसची सूत्रे असणार आहेत, परंतु राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस अध्यक्षपद स्विकारावे, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक वरि÷ नेत्यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदावरून चर्चा झाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारावे अशी मागणी केली. या मागणीला अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अनुमोदन दिले.
2017 साली राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारले होते. परंतु 2019 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या वरि÷ नेत्यांनी राहुल गांधी यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, परंतु राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिला होता. सध्या सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. तथापि, काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सध्याची वेळ योग्य नसल्याचा सल्ला, राहुल गांधींना त्यांच्या राजकीय सल्लागारांनी दिला आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, गोवा आणि उत्तराखंड अशा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे आडाखे बांधले जात आहेत.
सप्टेंबर 2022 मध्ये अध्यक्षपद निवडणूक
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 2022 च्या सप्टेंबरमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका सप्टेंबर 2022 दरम्यान होण्याची शक्मयता असून या निवडणुकीचा अंतिम आराखडा बनवला जात आहे. जून 2021 मध्येच काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कुणकूण लागली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली होती.