विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना पंढरपूर-सांगोला मार्गावर दुर्घटना : तिघेजण जखमी
प्रतिनिधी /सोलापूर
पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाला पंढरपूर-सांगोला मार्गावर अपघात झाला. यामध्ये बेळगाव येथील अनगोळचे दोन भाविक ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. अपघातातील मृत आणि जखमी बेळगाव जिल्हय़ातील आहेत.
शनिवारी पाच जण पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी चारचाकी वाहनाने गेले होते. पहाटे दीडच्या सुमारास पंढरपूर-सांगोला मार्गावर वनीकरणाजवळील कासेगाव फाटा येथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.
या अपघातात राजू संभाजी शिंदोळकर (वय 45), परशुराम संभाजी जवरुचे (वय 50, रा. दोघेही रा. अनगोळ, ता. बेळगाव) यांचा मृत्यू झाला. तर चालक राजकवी कृष्णा मधुकर (वय 23), अभिजित हुंदरे (वय 28) आणि गीतेश पोकंशेकर (वय 26, रा. तिघेही अनगोळ, ता. बेळगाव) हे जखमी झाले
आहेत.
जखमींना पंढरपुरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पंढरपूर-सांगोला रोडवरील कासेगाव फाटय़ानजीक कार उलटून मृत्युमुखी पडलेल्या बेळगाव येथील दोघा भाविकांवर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मृतदेह बेळगावला पोहोचले त्यावेळी कुटुंबीय व आप्तेष्टांनी एकच आक्रोश केला. आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी कारमधून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला होता. रविवारी पहाटे दीड वाजता ही घटना घडली आहे. परशुराम संभाजी जवरुचे (वय 50), राजू संभाजी शिंदोळकर (वय 37) दोघेही राहणार भांदूर गल्ली, अनगोळ अशी त्या दुर्दैवी भाविकांची नावे आहेत. सोमवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.
राजू शिंदोळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. राजू हे उत्तम छायाचित्रकार होते. म. ए. समितीचे नि÷ावंत कार्यकर्ते व समाजकार्यात नेहमी आघाडीवर राहणारे होते. राजूंचा मृतदेह घरी पोहोचताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. त्यावेळी त्यांच्या मुलीचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे भरून आले.
परशुराम जवरुचे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. ते उद्यमबाग येथे कामाला जात होते. अलीकडेच त्यांनी नवीन घराचे बांधकामही सुरू केले होते. सोमवारी स्लॅब घालण्यासाठी नियोजन केले होते. आषाढी दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुढच्या कामाला सुरुवात करणार होते. त्याआधीच अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
कारमधून पाच जण पंढरपूरला जाताना कासेगाव फाटय़ाजवळ कार उलटून ही घटना घडली आहे. अनगोळ येथील दोघा भाविकांच्या अपघाती मृत्युमुळे अनगोळवर शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कारावेळी आप्तेष्टांची स्मशानभूमीत गर्दी झाली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले.
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यविधी
रविवारी रात्री राजू शिंदोळकर व परशराम जवरुचे या भाविकांच्या मृतदेहावर चिदंबरनगर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानातील विद्युत दिवे बंद होते, त्यामुळे अंधारातच सर्व विधी उरकावे लागत होते. मनपा प्रशासनाच्या या कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावे लागले.