कचऱयाचे साम्राज्य पसरल्याने नाराजी : आता सामाजिक कार्यकर्त्यांनीच स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ, चिदंबरनगर येथील स्मशानभूमीमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या स्मशानभूमीमध्ये पावसाळय़ात सर्वत्र पाणी साचून राहत आहे. अलीकडेच या स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. सहा चौथरे बांधून त्यावर बीडच्या शेगडय़ा बसविण्यात आल्या आहेत. छतही बांधण्यात आले आहे. लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे.
या ठिकाणी बांधकाम करून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी पाणी साचून आहे. प्रवेशद्वारासमोरही लाखो रुपये खर्च करून मोठी इमारत बांधण्यात आली आहे. हातपाय धुण्यासाठी कूपनलिका आहे. जलकुंभ उभारण्यात आले आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱया नागरिकांची सर्व सोय केली गेली आहे. इतके सारे असूनही स्मशानभूमीमध्ये मात्र स्वच्छता नाही. तेथेच राख आणि कपडे पडून आहेत. अर्धवट जळालेली लाकडे आहेत. प्रेतावरील हार, कपडे व इतर साहित्य तेथेच फेकून दिले जात आहे. त्यामुळे या स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली आहे.
पावसाळय़ात या ठिकाणी अंत्यसंस्कार करणे कठीण बनले आहे. रक्षाविसर्जन करणारे काही राख भरून घेऊन उर्वरित राख त्याच ठिकाणी फेकून देत आहेत. कोणत्याही मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना काही तरुण व पंचमंडळी तात्पुरती स्वच्छता करत आहेत. मात्र या ठिकाणी कायमस्वरुपी स्वच्छता करणे गरजेचे असून अनगोळमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच संघटनांनी या स्मशानभूमीची स्वच्छता करून या स्मशानभूमीला आधुनिक स्वरुप प्राप्त करून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
या स्मशानभूमीमध्ये झाडेदेखील आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना सावलीही मिळते. मात्र या झाडांचा पडलेला पाला तसाच पडून राहतो व पावसाळय़ात कुजून जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच चिखलाचे साम्राज्यही निर्माण होते. यामुळे अंत्यसंस्कार करताना मोठी समस्या निर्माण होत आहे. काही ठिकाणी गवत उगवलेले आहे. याचबरोबर झुडूपेही आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव तसेच इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेव्हा आता या स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
महापालिकेने स्मशानभूमीची देखभाल करावी
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिकेने या स्मशानभूमीची देखभाल करावी यासाठी उपोषण केले. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. तेव्हा आता जनतेनेच या स्मशानभूमीच्या विकासासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे. महापालिकेनेही कायमस्वरुपी सुरक्षारक्षक ठेवावा. तसेच पथदीपांची सोय करावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.