नागरिकांना भेडसावते पाणीटंचाईची समस्या : त्वरित निवारण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ मारुती गल्ली परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पण येथील कूपनलिका गेल्या महिन्याभरापासून बंद अवस्थेत आहे. परिणामी परिसरातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे तक्रारी करूनही याची दखल घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
अनगोळ भागातील काही परिसरात 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. पण काही ठिकाणी तो सुरळीत नसल्याने कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याची सुविधा पाणीपुरवठा मंडळाने उपलब्ध केली आहे. मारुती गल्ली परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी कूपनलिकेची खोदाई करून सिंटेक्स टाकीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावत नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून येथील कूपनलिका नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नळाला येणाऱया पिण्याच्या पाण्यावरच आपले कामकाज उरकावे लागत आहे. अन्यथा पाणी टँकरने विकत घ्यावे लागत आहे. कूपनलिकेच्या दुरुस्तीसाठी रहिवाशांनी पाणीपुरवठा मंडळाकडे अनेकवेळा तक्रार केली. पण याची दखल घेण्याकडे मंडळाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. सध्या हिडकल जलाशयाचा पाणीपुरवठा बंद असल्याने 24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यामुळे मारुती गल्ली परिसरातील नागरिकांना सध्या पाण्याची अडचण भासत आहे. त्यामुळे येथील कूपनलिकेची दुरुस्ती करून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.