प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ परिसरातील तलावांचा विकास करण्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या ठिकाणी गटारीचे पाणी मिसळत असल्याने माती टाकून तलावात जाणारे पाणी अडविण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी वाढलेले केंदाळ काढूनही येथील तलावाला पुन्हा केंदाळाचा विळखा वाढला आहे. त्यामुळे याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
अनगोळ परिसरात विविध तलाव असून, काळा तलावाचा विकास मुख्यमंत्री विकास अनुदानातून करण्यात आला आहे. यापूर्वी संपूर्ण तलाव स्वच्छ करून तलावाच्या बांधावर दगड लावून सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्न झाला होता. पण विविध गल्ल्यांमधील गटारींमधून वाहणारे पाणी येथील तलावात सोडण्यात आल्याने कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या या पाण्यासोबत तलावामध्ये साचत होत्या. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरली आहे.
तलावाच्या पूर्व आणि दक्षिण बाजूस शेती असल्याने पाण्याचा पाझर शेतीसाठी उपयुक्त आहे. मात्र, तलावामध्ये केंदाळ वाढत असल्याने पाणी विषारी बनत होते. त्यामुळे तलावाच्या विकासावेळी संपूर्ण केंदाळ काढून स्वच्छ करण्यात आले होते. तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तलावात मातीचा बंधारा घातला आहे. त्यामुळे सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
या तलावात साचलेला कचरा हटवून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पण केंदाळ वाढण्याचे प्रमाण सुरूच आहे. संपूर्ण स्वच्छ करण्यात आलेल्या तलावाला पुन्हा केंदाळाचा विळखा वाढला आहे. केंदाळ वाढल्याने तलाव पुन्हा नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. केंदाळ वाढू नये याकरिता महापालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.