प्रतिनिधी /बेळगाव
शहरात एकीकडे पाण्याचा तुटवडा जाणवत असताना अनगोळ मुख्य रस्त्यावरील व्हॉल्वच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत परिसरातील रहिवाशांनी अनेकवेळा तक्रारी करून देखील दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
अनगोळ येथील मुख्य रस्त्यावर पाण्याचा व्हॉल्व असून काहीभागात येथून पाणीपुरवठा केला जातो. या भागातील ही मुख्य जलवाहिनी आहे. पाणीपुरवठा सुरू असताना या व्हॉल्वमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. पाण्याची गळती होऊन पिण्याचे पाणी गटारीद्वारे वाहून जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लागलेली गळती थांबविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणी वाचवा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते. पण प्रशासनाकडूनच याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गळती निवारण करून पाणीपुरवठा होत नसलेल्या भागात सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.