सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
प्रतिनिधी /बेळगाव
मृत्युंजयनगर, अनगोळ येथे बुधवारी दोन कारची टक्कर होऊन अपघात घडला. या अपघातात केवळ सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्रीपर्यंत यासंबंधी पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती.
एका कारच्या ठोकरीनंतर दुसरी कार जलतरण तलावाजवळ उलटली. घटनास्थळी गर्दी जमली होती. गेल्या काही महिन्यांपासून या भागात वारंवार अपघात घडत आहेत. मृत्युंजयनगर, एस. व्ही. रोड, चिदंबरनगर परिसरात पेव्हर्स ब्लॉक बसविण्यात आले आहेत. या परिसरात जोडरस्ते मोठय़ा प्रमाणात आहेत. इमारतींसमोर कंपाऊंडची भिंत असल्याने दुसऱया बाजुने येणाऱया वाहनांचा अंदाज येत नाही. याबरोबरच परिसरात गतिरोधक नसल्यामुळे अपघात वाढले आहेत.
अपघात टाळण्यासाठी त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. गरज नसलेल्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात येतात. मात्र ज्या परिसरात अपघात वाढले आहेत. तेथे गतिरोधक बसविण्याची मागणी असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.