वाहतुकीसाठी अडचण : खड्डा बुजविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून अनगोळ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून त्यामुळे वाहतुकीला मोठी समस्या होत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौकमध्ये खड्डा काढून बरेच दिवस उलटले आहेत. पावसामुळे या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेली सर्व कामे अत्यंत संथगतीने होत असून दिरंगाईबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. बऱयाचवेळा या कामांमुळे लहान-मोठे अपघातही घडले आहेत. यामुळे अनगोळच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पदपथाचे काम अर्धवट आहे. विद्युत वाहिनी घालण्याचे कामही अर्धवट असून भलामोठा खड्डा खणून ठेवण्यात आला आहे. या खड्डय़ाची माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातूनच साऱयांना ये-जा करावी लागत आहे. बस तसेच मोठी वाहने जाताना अडथळा निर्माण होत आहे.
कोरोनामुळे विविध समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्यासाठी जवळपास कंत्राटदाराने दोन-तीन वर्षे वेळ घेतला आहे. तरीदेखील अजूनही काम अर्धवटच आहे. आता हा खड्डा धोकादायक ठरत असून तातडीने तो बुजवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.