काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण होणार : दोन उपनगरांना जोडणारा सोयीचा रस्ता
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ-वडगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन सहा महिने झाले. पण विविध कारणांमुळे हे काम रखडले होते. मात्र अलिकडेच या रस्त्याशेजारी गटारी बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनगोळपासून एका बाजुच्या गटारीचे बांधकाम प्रारंभ करण्यात आले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे.
अनगोळ आणि वडगाव परिसराला जोडणाऱया संपर्क रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता दोन उपनगरांना जोडणारा असल्याने सोयीचा आहे. उद्यमबागहून अनगोळ आणि अनगोळवरून वडगावमार्गे राष्ट्रीय महामार्गाला येण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. पण या रस्त्याशेजारी विविध नवीन वसाहती निर्माण झाल्याने रस्त्याची रुंदी कमी-जास्त होती. त्यामुळे वाहनधारकांना अडचण निर्माण होत होती. महापालिकेने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. सदर रस्ता खराब झाल्याने विकास करण्याच्यादृष्टीने काम सुरू करण्यात आले होते. पण काही अडचणींमुळे रुंदीकरणाचे काम रखडले होते. संपूर्ण रस्ता खराब झाला असून, ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अलिकडेच या रस्त्याच्या कामास पुन्हा प्रारंभ करण्यात आला असून, गटारी बांधकामाचे काम सुरू झाले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे बांधकाम करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. सध्या अनगोळपासून गटार बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचणीतूनच ये-जा करावी लागणार आहे. गटारीचे बांधकाम पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरणही लवकर करावे, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.