अन्न-नागरी पुरवठा खात्याचे आवाहन : अन्यथा लाभार्थ्यांकडून बाजारभावानुसार दंड वसूल करण्याचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
आर्थिकदृष्टय़ा सक्षम असून देखील खोटी कागदपत्रे देऊन बीपीएल रेशनकार्ड मिळविलेल्या सरकारी कर्मचारी आणि आर्थिकदृष्टय़ा धनाढय़ असलेल्यांनी आपली रेशनकार्डे तातडीने दि. 30 जूनपर्यंत जमा करावीत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिला आहे.
शासनाच्यावतीने दुर्बल घटकांसाठी तसेच 1 लाख 20 हजार रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱया (शहरीभाग) कुटुंबीयांसाठी बीपीएल कार्डे दिली आहेत. मात्र काहींनी खोटी माहिती देऊन आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनही बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशांनी आपली कार्डे स्वतःहून 30 जूनपूर्वी संबंधित तहसीलदार कार्यालयात तातडीने जमा करावीत, असे आवाहन खात्याने केले आहे.
खोटी माहिती देऊन मिळविलेली बीपीएल कार्डे मुदतीत परत करणाऱयांना एपीएल रेशनकार्डे दिली जाणार आहेत. शिवाय कोणताही दंड आकारण्यात येणार नाही. मात्र मुदत संपल्यानंतर अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आतापर्यंत घेतलेल्या रेशनची बाजारभावानुसार होणारी किंमत दंड स्वरूपात वसूल केली जाणार आहे.
गोरगरीब जनतेचा दर्जा उंचावावा व जीवनावश्यक साहित्य रेशनद्वारे सहज उपलब्ध व्हावे, याकरिता शासनाकडून रेशनचा पुरवठा केला जातो. बीपीएल कार्डे मिळविण्यासाठी असंख्य धनाढय़ कुटुंबीयांनी, सरकारी कर्मचारी तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱयांनी आर्थिक परिस्थिती सुदृढ असूनही आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावाने बीपीएल कार्डे मिळविली आहेत. यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला खोटा देण्यात आला आहे. शहर परिसरात एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठय़ा जागेत घर असणाऱया याबरोबरच शिक्षण, परिवहन, हेस्कॉम, रेल्वे, पोलीस आदी खात्यातील सरकारी कर्मचाऱयांनी आपली नावे वगळून कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने बीपीएल कार्डे घेतली आहेत. अशांनी स्वतःहून आपली बीपीएल कार्डे जमा करावीत, असे वारंवार खात्याकडून आवाहन करून देखील संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. अशांवर आता कारवाई केली जाणार आहे.
यापूर्वी खात्याकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही लाभार्थ्यांनी आपली कार्डे जमा केली आहेत. मात्र अद्यापही बरेच जण अनधिकृत रेशनकार्डचा वापर करून रेशनचा लाभ घेत असल्याचे खात्याच्या निदर्शनास आले आहे.