अध्याय तेरावा
भगवंत सनकदिकांना म्हणाले, देहाभिमान धरून आणि भेददृष्टि ठेवून कोटय़वधी वेदशास्त्रे पठण केली तरी परमार्थ साध्य होत नाही.
देहाभिमानासह सर्व भेदभावना जोपर्यंत पूर्णपणे गेली नाही, तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. तुकारामबुवांनी भगवंतांचे मनोगत बरोबर जाणले होते म्हणून ते त्यांच्या एका अभंगात वैष्णवांचा धर्म समजाऊन सांगताना म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद-भ्रम अमंगळ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा।
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे । तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुखदुःख जीव भोग पावे । बुवा सांगतात सर्व जग विष्णुमय आहे हे लक्षात घेऊन वैष्णवांनी भेदाभेद भ्रम अमंगळ समजून त्याचा त्याग करावा. त्यासाठी भागवताचा अभ्यास करा म्हणजे तुमच्याकडून सत्य व हितकर असंच वागणं होईल. हे सांगण्याचं कारण म्हणजे आपण सर्व एकाच ईश्वररूपी देहाचे अवयव आहोत. भगवंतांच्या सांगण्याची अनुभूती ईश्वराचे अनन्य भक्त असलेल्या बुवांनी घेतली पण सनकदिकांच्या मनात अजूनही शंका होती. म्हणून त्यांनी विचारले, मनातून भेद गेल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही असे तुम्ही म्हणता, पण भेद हा वेदानेच प्रतिपादन केलेला आहे मग वेदाचे म्हणणे खोटे कसे म्हणता येईल ? त्यावर देव म्हणाले, मी तुम्हाला वेदवचनातील निरनिराळय़ा भागांचा विचार नीट सांगतो.
समाजाचे संचालन सुव्यवस्थित चालावे म्हणून मी वेदवचन सांगितले आहे. ज्याच्या मनात अज्ञानरुपी भेद ठाण मांडून बसलेला आहे त्याच्यासाठी हा वेदाचा नियम लागू होतो परंतु ज्या भक्ताला माझ्या स्वरूपात पूर्ण ऐक्मय लाभलेले असते, माझ्याशिवाय अन्य कशालाच अस्तित्व नसून, सर्वव्यापी काय तो मीच असल्याने भेदाला मुळीच थारा नाही हे लक्षात आलेले असते. त्याच्या या अनन्यतेपाशी वेदवचने लाचार होतात. वेद हा तीन गुणांनी व्याप्तच आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात भेदभावना आहे त्यांना वेदवचनांचे बंधन लागू होणारच पण अभेदभजनाने भक्त हा निर्गुण झालेला असतो, तेव्हा त्याला माझ्या आज्ञेमुळे वेदाचे निर्बंध मुळीच लागू होत नाहीत. राजाचा जिवलग नोकर असला, तर त्याला दारातला पहारेकरी कधी अटकाव करीत नाही किंवा एखादी व्यक्ती जर राजाची लाडकी असेल, तर मोठे मोठे प्रधानादि लोकसुद्धा तिला मान देतात. त्याप्रमाणे भक्तांच्या अनन्यतेपुढे मी सुद्धा शीर झुकवलेले असल्याने त्यांच्यापुढे वेदाचे काही चालत नाही. भेदभावना जोपर्यंत प्रबळ असते, तोपर्यंत वेदाचे वचन ओलांडता येत नाही. माझे भक्त अभेदभावना धरणारे असतात, त्यांना कोणतेच विधान बाधक होत नाही.
भक्तांना इच्छा नसतात. त्यामुळे अविद्यारूपाने बाधक होणारी आशा त्यांनी छेदून टाकलेली असल्याने त्यांना वेदवचन बाधत नाही. या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही देहादिक वस्तू सत्य नाही हे भक्तांना उमगलेले असते पण अज्ञानी लोक निद्रिस्तच असतात म्हणून अज्ञानी माणसे खोटय़ा देहाच्या आश्रयाने रहात असतात.
खरे पाहता वर्णाश्रमधर्म त्यामुळे मिळणाऱया स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे. गुरुकृपेच्या योगाने जो ज्ञानसंपन्न होतो, त्याला देहाची भावना बाधक होत नाही. त्याला प्रपंचाचे दर्शन मिथ्या होते आणि त्याने कर्मे केली तरी त्यामुळे त्याच्याकडे कर्तेपणा येत
नाही.
वर्ण आणि आश्रम हे अज्ञानानेच निर्मिलेले असल्याने क्रियाकर्मही अज्ञानात्मकच असते. परंतु ज्ञानसंपन्न भक्त असतात त्यांच्या ठिकाणी अज्ञान मुळीच नसते. म्हणून त्यांना वेदवचन बाधत नाही. आंब्याला जोपर्यंत फळे आलेली असतात, तोपर्यंतच त्याला दक्षतेने राखण राहते. पण फळे हाती आली की, आपोआपच राखण निष्फळ होते. त्याप्रमाणे जोपर्यंत अज्ञानाचे बंधन आहे, तोपर्यंत वेदाचे वचन बंधक आहे. अज्ञानच नाहीसे झाले असता वेदविधीने ते ठिकाण सोडलेच म्हणून समजावे.
क्रमशः