माजी हवाई दल अधिकाऱयाची बिपिन रावत यांना आदरांजली
मनीषा सुभेदार / बेळगाव
‘माझ्या देशाच्या जमिनीचा इंच अन् इंच माझा आहे आणि तिचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. माझ्या देशासाठी मी प्राण पणाला लावणार नाही तर माझ्या देशाच्या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी मी कटिबद्ध आहे’, असे जनरल बिपिन रावत म्हणत असत. एक लढवय्या योद्धा असणाऱया तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या निधनाने केवळ लष्कराची नव्हे तर देशाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेले निर्णय आणि आखलेल्या उपाययोजना अंमलात आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि तीच त्यांना आदरांजली ठरेल…’ या भावना आहेत हवाई दलातील निवृत्त सार्जंट आणि या दलात विविध पदांवर काम केलेले 84 वषीय आप्पाजी कुलकर्णी यांचे.
आप्पाजी कुलकर्णी 1957 ते 1972 दरम्यान हवाई दलात कार्यरत होते. या दलामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. चीन आणि पाकिस्तान विरोधी मोहिमेमध्ये ते सहभागी झाले होते. तर गोवा मुक्ती आणि बांगलादेश मुक्ती आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. या प्रवासात त्यांनी अनेक थरारक प्रसंग आणि घटना अनुभवल्या. हवाई दलाबद्दल त्यांना अतिशय अभिमान आहे. याच पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा बिपिन रावत यांच्या निधनामुळे ‘रत्नजडित हारातील रत्न’ आपण गमावले आहे, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.
ते म्हणाले, बिपिन रावत यांना तिन्ही दलाचे प्रमुख करणे हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. वास्तविक हा निर्णय खूप आधी व्हायला हवा होता. आज हवाई दलाचे महत्त्व विशेष वाढले आहे. याचे कारण म्हणजे यापुढे जमिनीवरील युद्ध कमी होत जाईल आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून युद्ध होऊ शकते. हवाई दल म्हणजे ‘मेन अँड मटेरियल’ यांचा संगम आहे. रणगाडे घेऊन युद्ध करू शकतील, अशी विमाने आपल्याकडे आहेत. सीएन-12, हक्मर्युलस अशा विमानातून आपण अत्यंत उंचीवरील लढाई लढू शकतो. त्यामुळे हवाई दलाचे महत्त्व वाढले आहे.
जनरल रावत यांच्याबद्दल बोलताना आप्पाजी म्हणाले, ते अत्यंत कणखर आणि कर्तव्यकठोर होते. महत्त्वाचे म्हणजे एक विचारवंत म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात असे. आपल्या लष्कराला सैनिकीकरणाचे रूप त्यांनी दिले. सर्जिकल स्ट्राईकच्या मागील प्रेरणा त्यांची होती. शत्रूला त्याच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे म्हणजे आपल्याला आणि शत्रूलासुद्धा आपल्या क्षमतेची जाणीव राहते, असे रावत मानत. माझे काम केवळ दिल्लीत नव्हे तर हिंदुस्थानभर आहे आणि माझे जवान कोठे कोठे आहेत, तेथे त्यांना भेटणे माझे कर्तव्य आहे, असे रावत मानत. लष्करासाठी ही भावना खूप महत्त्वाची होती, अशी पुष्टीही आप्पाजी यांनी जोडली.
सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे रावत यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांच्या पुढाकाराने लेह-लडाखपर्यंत रस्ते नव्हे तर धावपट्टीही तयार झाली. त्यांच्या या निर्णयाचे महत्त्व आज आपल्याला कळते. एक काळ असा होता, की लेह-लडाखपर्यंत येऊन कोण आपल्याला आव्हान देईल, असे वाटत होते. परंतु, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे जनरल रावत यांनी घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व आता लक्षात येत आहे.
लष्करातील प्रमुख रेजिमेंटपैकी गोरखा रेजिमेंट एक महत्त्वाची मानली जाते. जनरल बिपिन रावत या रेजिमेंटचेच होते. त्यांनी सूत्रे हाती घेतल्यावर ईशान्येतील राज्यांकडे अधिक लक्ष दिले आणि शत्रूंचा बिमोड केला. अरुणाचल प्रदेशसुद्धा आमचाच, असा कांगावा करणाऱया चीनला सुद्धा त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. ज्या कमकुवत बाजू आहेत, त्या सक्षम करणे आणि ज्या सक्षम बाजू आहेत त्यांना अधिक मजबूत करणे हे जनरल रावत यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्टय़ होते, असे निरीक्षणही आप्पाजी कुलकर्णी यांनी टिपले.
आप्पाजींच्या मते आजवरच्या सेवेमध्ये लष्कर हा दुर्लक्षित घटक राहिला होता. केवळ बिपिन रावत यांच्यामुळे त्यामध्ये काळानुरुप बदल करण्याचे महत्त्व सरकारला पटले, ही बाब देश सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी प्रत्येक भारतीय बिपिन रावत यांच्याप्रति कृतज्ञ राहील, अशा भावनाही आप्पाजी यांनी व्यक्त केल्या.
झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबद्दल आप्पाजी म्हणतात, हेलिकॉप्टर अपघातामागे एखादी व्यक्ती कारणीभूत असण्याची शक्मयता खूप धुसर असते. तांत्रिक बिघाड कधीही होऊ शकतो. ती शक्मयता नाकारता येत नाही. परंतु, जेथे खूप दरी असते तेथून विमान जाताना ‘एअर पॅकेट’ निर्माण होतो आणि विमान खाली कोसळते. या अपघातामध्ये कदाचित तसे घडले असावे. कुन्नूर हे असे ठिकाण आहे जेथे घातपाताची शक्मयता मला दिसत नाही. शिवाय प्रवासी वाहतूक हेलिकॉप्टर पूर्णतः सुरक्षिततच असते. येथे ब्लॅकबॉक्सचा पायलटशी संपर्क तुटला, ही बाबसुद्धा लक्षात घ्यायला हवी. अर्थात अधिक चौकशी आणि तपासाअंती सत्य बाहेर येईल, तोपर्यंत कोणताही निष्कर्षाप्रत येणे योग्य ठरणार नाही.