-जिल्हाधिकारी मिश्रा यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ाचा पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांदरम्यान असून ऑक्सिजन बेड्स 67 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ात 9 जूनपर्यंत कडक निर्बंध राहतील, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अनलॉक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवरील निर्णयाबाबतचा नागरिकांचा संभ्रम दूर झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी दर, ऑक्सिजन बेड्सवरील बाधितांचा टक्का या आधारावर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यासाठी एकूण 5 स्तर निश्चित केले. या निकषानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यात समाविष्ट झाला आहे. अनलॉकच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सोमवारपासून (7 जून) होणार आहे, मात्र चौथ्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या रत्नागिरी जिह्यात अनलॉकच्या निर्णयासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही आदेश काढलेले नाहीत. तसेच जिल्हाधिकारी मिश्रा यांनी आवश्यकता भासेल त्यानुसार आदेश काढू, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे अनलॉकपेक्षा रत्नागिरीत 9 जूनपर्यंत कडक निर्बंध राहतील, हे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्क्यांदरम्यान असून ऑक्सिजन बेड्स 67 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. जिह्यात साडेचार हजार बाधित असून पावणेसहाशेजण ऑक्सिजन बेडवर आहेत. उपलब्ध बेडस्च्या तुलनेत ऑक्सिजन बेडवरील संख्या चिंताजनक आहे. अनलॉकची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे. सिंधुदुर्ग जिह्यात प्रशासनाकडून अनलॉकसंदर्भात रविवारी सायंकाळी आदेश काढले; मात्र रत्नागिरी जिह्यात त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. या संदर्भात जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सूतोवाच करत निर्बंध 9 जूनपर्यंत कडक राहतील, असे सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच मी मार्गदर्शक सूचनांनुसार आदेश काढेन आणि तेच वैध असतील. अनलॉक प्रक्रियेबद्दल रत्नागिरीत कोणत्याही गोष्टीचा गोंधळ होऊ नये.
अजून 2 दिवसांची प्रतीक्षा
अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने 4 वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. 3, 4 आणि 5 या स्तरांतील भागात इतर अनेक निर्बंध कायम राहणार आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिह्यात 9 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन केले. नागरिकांकडूनही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बाहेर फिरणाऱयांची संख्या तुरळक आहे. चौथ्या टप्प्यातील निकषांच्या अंमलबजावणीसाठी अजून 2 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.